नवी दिल्ली - देशाच्या हितासाठी आणि भाजपला हरवण्यासाठी लोकसभा निडवणुकांच्या नंतर विरोधी पक्ष आघाडी करण्याची दाट शक्यता आहे, असे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी म्हटले आहे. बंगळुरु येथे एका वृत्तसंस्थेशी संवाद साधताना राहुल गांधी यांनी हे वक्तव्य केले. त्यामुळे राजकीय वातारणात त्यांच्या या वक्तव्याचे पडसाद उमटण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
सध्या देशभरात लोकसभा निडवणुकांच्या तोंडावर राजकीय हालचालींना वेग आला आहे. भाजपला हरवण्यासाठी काँग्रेसच्या नेतृत्वात स्थानिक पक्ष आघाडी करतील, असे चित्र पुर्वी दिसत होते. मात्र, निवडणुकांसाठी विविध राज्यांमध्ये स्थानिक पक्षांनी आघाडी केली आहे. तर, उत्तर प्रदेश सारख्या मोठ्या राज्यात बसप आणि समाजवादी पक्षाने काँग्रेसला आघाडीपासून दुर ठेवले आहे. काँग्रेस बिहारमध्ये राष्ट्रीय जनता दलासह इतर स्थानिक पक्षांच्या आघाडीमध्ये आहे.
देशातील सर्वच भाजप विरोधी पक्षांचे पहिले काम हे मोदी यांना हरवण्याचे आहे. लोकशाही आणि संविधान वाचवण्याचे आहे. देशाला नेस्तनाबूत करण्यापासून वाचवण्यासाठी भाजपला हरवणे गरजेचे आहे. देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये वाढ आणि रोजगार निर्मिती, देशामध्ये एकोपा आणि समानता राहण्यासाठी आम्ही सर्व विरोधी पक्ष एकत्र आहोत, असे राहुल गांधी यांनी यावेळी म्हटले.
त्यांच्या या वक्तव्यामुळे सध्या विखुरलेली महाआघाडी निवडणुकांनतर होणार का? असा प्रश्न आता राजकीय वर्तुळात उठला आहे. हा देश मोदी यांना घेरण्यासाठी उभा झाला आहे, असेही राहुल गांधी यांनी म्हटल्यामुळे आता आगामी लोकसभा निवडणुकांवर याचा काय परिणाम होणार हे पाहण्यासारखे झाले आहे.