नवी दिल्ली - पंतप्रधान मोदींनी आज (मंगळवार) केरळ आणि कर्नाटक राज्यांला जोडणाऱ्या ४५० किमी लांब नैसर्गिक वायू पाईपलाईनचे उद्धाटन केले. ही पाईपलाईन कोची ते कर्नाटकातील मंगळुरूपर्यंत आहे. भाजप सरकारच्या काळात रेल्वे, महामार्ग, मेट्रो, हवाई सेवा, जलमार्ग, डिजीटल आणि वायू क्षेत्रात अभूतपूर्व काम होत असून विकासाच्या मुद्द्यावर राज्य आणि केंद्र सरकारने एकत्र येऊन काम करावे, असे मोदी म्हणाले.
स्वच्छ उर्जा निर्मिती दुप्पट करणार -
सरकारच्या उर्जा धोरणाची माहिती मोदींनी यावेळी दिली. स्वच्छ नैसर्गिक वायूचे उत्पादन दुप्पट करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे मोदी म्हणाले. संपूर्ण देशाला एकाच गॅस पाईपलाईनच्या ग्रीडने जोडणार असल्याचेही मोदी यावेळी म्हणाले. सरकारचे उर्जा धोरण सर्वसमावेशक असून एकात्म पद्धतीने देशातील उर्जा प्रकल्पांचा विकास करण्यात येत असल्याचे मोदी म्हणाले.
जैवइंधन प्रकल्पांवर भर -
मागील पाच ते सहा वर्षात नैसर्गिक वायू पाईपलाईनचे जाळे दुपटीने म्हणजेच ३२ हजार किमीने वाढवण्यात आले आहे. त्यासोबतच जैवइंधन निर्मिती प्रकल्पांकडेही लक्ष देण्यात येत आहे. दहा वर्षांच्या काळात पेट्रोलमध्ये उसापासून तसेच इतर कृषी उत्पादनांपासून तयार केलेले इथेनॉल २० टक्क्यांपर्यंत मिसळण्यात येत आहे. देशातील नैसर्गिक वायूंचे प्रमाण सध्याच्या ६.२ टक्क्यांवरून १५ टक्के करण्याचे सरकारचे लक्ष्य असल्याचे मोदी म्हणाले.
वायू प्रकल्पांना चालना देणार -
नॅचरल गॅस पाईपलाईनच्या ग्रीडमुळे स्वच्छ उर्जा सर्वांना उपलब्ध होईल. तसेच शहरांच्या वायू प्रकल्पांना चालना मिळले. गाड्यांमध्ये नैसर्गिक वायूचा वापर १९९२ सालापासून सुरू झाल्यानंतर २०१४ पर्यंत फक्त ९०० सीएनजी पंप उभे राहिले. मात्र, पुढील सहा वर्षात देशात दीड हजार सीएनजी पंप उभे राहिले. ही संख्या १० हजारांवर नेण्याचे लक्ष्य आहे, असे मोदी म्हणाले.