भोपाळ - कोरोनावर मात करण्यासाठी देशभरामध्ये लॉकडाऊन करण्यात आले आहे. लॉकडाऊनमुळे स्थलांतरीत कामगारांना अडचणींचा सामना करावा लागत आहे. मदतीचा हात म्हणून गरजू व स्थलांतरित कामगारांसाठी भोपाळमधील रहिवाशांनी कपडे, शूज आणि इतर वस्तू -गांधीनगर बायपास रस्त्याजवळ असलेल्या पदपथवर ठेवल्या आहेत.
महाराष्ट्रातून उत्तर प्रदेश व बिहारच्या दिशेने जाणारे लोक मोठ्या संख्येने दररोज या भागातून जातात. ते त्यांच्या आवश्यकतेनुसार येथे ठेवलेल्या वस्तू घेऊ शकतात. शहरातील पुलाखाली स्थलांतरित कामगार राहत आहेत. त्यांनाही स्थानिकांनी अन्न आणि इतर आवश्यक वस्तू दिल्या आहेत.
लॉकडाऊनचा देशातील जनतेवर आणि त्यातही विशेषतः कामगार, मजूर आणि हातावर पोट असणाऱ्यांवर संकट कोसळले आहे. भारतात लाखो कामगारांचे जीवन हे रोज मिळणाऱ्या कामावर असून त्यातून मिळणाऱ्या पैशातून त्यांचा दिवस कसाबसा जातो. त्यामुळे लॉकडाऊनच्या काळात पोट भागवणार कसं? हा यक्षप्रश्न या मजूर वर्गासमोर आ वासून उभा राहिला.