इस्लामाबाद - भारत आणि पाकिस्तानदरम्यानची 'समझौता एक्स्प्रेस' ही रेल्वेगाडी पाकिस्तानकडून रद्द करण्यात आली आहे. याप्रकरणी पुढील निर्देश येईपर्यंत ही गाडी बंद ठेवण्यात येणार असल्याची माहिती माध्यमांनी दिली. पुलवामा हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेतला असल्याचे सांगितले जात आहे.
सोमवारी आणि गुरुवारी ही रेल्वेगाडी लाहोरवरुन निघत असते. आठवड्यातून दोन दिवस असणारी ही गाडी १६ प्रवासी घेऊन निघाली होती. ही गाडी कराचीहून निघाली होती. मात्र, प्रवाशांना लाहोर रेल्वेस्थानकावर थांबून ठेवण्यात आले, अशी माहिती माध्यमांनी दिली आहे. शिमला करारानुसार २२ जुलै १९७६ ला भारत-पाकिस्तानदरम्यान ही रेल्वेगाडी सुरू करण्यात आली होती.
काल (बुधवारी) रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी समझौता एक्स्प्रेसबद्दल माहिती दिली होती. आम्हाला समझौता एक्स्प्रेसच्या बदलाबाबत अद्याप कुठलीच अधिकृत माहिती मिळालेली नाही. याप्रकरणी निर्देश मिळाल्यानंतर आम्ही पुढील पाऊल उचलू, असे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी सांगितले होते.