नवी दिल्ली - यावर्षी नैऋत्य मान्सून ठरलेल्या वेळेच्या दोन आठवडे आधीच देशभर पसरला , अशी माहिती हवामान विभागाने दिली. मान्सूनचे शेवटचे ठिकाण असलेल्या राजस्थानातही यावर्षी तो लवकर पोहोचला.
सर्वसामान्यपणे 1 जूनला मान्सून केरळमध्ये दाखल होतो. तर मान्सूनचे देशातील शेवटचे टोक असलेल्या राजस्थानातील श्रीगंगानगर येथे पोहोचण्यास 45 दिवसांचा कालावधी लागतो. मात्र, यावर्षी संपूर्ण देशात मान्सून पोहचण्याची तारीख 8 जुलै असेल, असे हवामान विभागाने म्हटले आहे.
राजस्थान, हरियाणा आणि पंजाब राज्यातही मान्सूनने कूच केली आहे. संपूर्ण देशात मान्सून आज 26 जून रोजी पसरला. बंगालच्या उपसागरावर कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. हा कमी दाबाचा पट्टा पश्चिम आणि वायव्य दिशेकडे सरकत आहे. त्यामुळे मान्सूनला पुढे सरकण्यास मदत झाली.
2013 साली मान्सून 16 जून रोजी देशभर पोहचला होता. त्याच वर्षी उत्तराखंड राज्यात पुरही आला होता. त्यानंतर आता यावर्षी मान्सून वेगाने देशभर पसरला आहे, असे हवामान विभागाचे संचालक मृत्यूंजय मोहापात्रा यांनी सांगितले.