नवी दिल्ली - गलवान नदी खोऱ्यामध्ये सोमवारी रात्री भारत आणि चीनच्या सैन्यामध्ये झालेल्या भीषण झटापटीनंतर, सलग तीन दिवस लष्कराच्या उच्चस्तरीय बैठका घेण्यात आल्या. गुरूवारी या बैठकांचा शेवट झाल्याची माहिती ईटीव्ही भारतच्या सूत्रांनी दिली आहे. या बैठका मेजर-जनरल रँकच्या अधिकाऱ्यांमध्ये होत होत्या.
गुरूवारी सकाळी सुरू झालेली चर्चा दुपारच्या सुमारास संपली. त्यानंतर पुढील चर्चा कधी होणार आहे, किंवा डिव्हिजनल कमांडर स्तरावर चर्चा होणार आहे, की नाही याबाबत कोणतीही माहिती समोर आली नाही. कदाचित आता लष्करी स्तरावर कोणतीही चर्चा होणार नाही, असे एका सूत्राने सांगितले.
दोन्ही सैन्यांदरम्यान होत असलेल्या झटापटींच्या पार्श्वभूमीवर, लष्करी स्तरावरील चर्चा आधीपासूनच सुरू होत्या. या चर्चा डी-एक्सेलेटरी प्रोसेसचा भाग होत्या. यामध्ये मग ४-५ मे रोजी लडाखच्या पांगाँग तलावाजवळ, आणि १० मे रोजी सिक्कीमजवळ झालेल्या सैनिकांमधील झटापटीबाबत चर्चा सुरू होत्या. मात्र, सोमवारी रात्री गलवान खोऱ्यामध्ये झालेली झटापट ही सर्वात भीषण आणि क्रूर ठरली.
सोमवारी रात्री ज्याठिकाणी झटापट झाली, त्याच पेट्रोल पॉइंट १४वर पुढील तीन बैठका पार पडल्या. या चौकीची जागा आजूबाजूच्या परिसरावर नजर ठेवण्यासाठी अतिशय योग्य आहे. त्यामुळेच भारत आणि चीन दोन्ही देशांच्या सैन्याला या जागेमध्ये रुची आहे. ही जागा उंचावर आहे, आणि खालून गलवान नदी वाहत जाते. सोमवारी झालेल्या झटापटीमध्ये काही सैनिक या नदीमध्ये पडून वाहून गेल्याचीही शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.
चीनचे सैनिक मोठ्या प्रमाणात होते, ते ज्या प्रकारच्या शस्त्रांचा वापर करत होते ते क्रूर होते; तरीही भारतीय सैन्याने आदेश नसल्यामुळे गोळीबार केला नाही. देशाचे सैनिक कोणत्याही परिस्थितीमध्ये नियमांचे उल्लंघन करणार नाहीत, हे यावरूनच सिद्ध होते.
सीमा भागातील प्रोटोकॉलनुसार, भारत आणि चीनचे सैनिक एकमेकांवर गोळ्या झाडू शकत नाहीत. विशेष म्हणजे, गोळी चालवण्याचे आदेशच नसल्यामुळे कित्येक सैनिक सीमेच्या दोन किलोमीटर परिसरात आपल्याजवळ शस्त्रे बाळगतही नाहीत. शिवाय, जरी त्यांच्याकडे बंदूका असतील तरी त्या नेहमी जमीनीच्या दिशेने रोखलेल्या असतात.
सुमारे २० भारतीय जवान, ज्यांमध्ये कमांडिंग ऑफिसर कर्नल बी. संतोष बाबू यांचाही समावेश होता, या झटापटीमध्ये हुतात्मा झाले. विशेष म्हणजे कर्नल बाबू हे याआधी चीनी सैन्यासोबत सुरू असलेला कित्येक बैठकींना स्वतः उपस्थित होते. यासोबतच, लष्कराचे कित्येक जवान यात जखमी झाले असल्याचे समोर आले आहेत. तर, चीनच्या बाजूचे किती सैनिक मारले गेले याची निश्चित संख्या समोर आली नाही.
दरम्यान, भारत सरकारने भारत-चीन बॉर्डर स्पेशालिस्ट फोर्सला (आयटीबीपी) सतर्क राहण्याचे आणि चीनी सैन्याच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यास सांगितले आहे. विशेष म्हणजे, लडाख ते अरुणाचल प्रदेश पर्यंत भारत-चीन सीमेची जबाबदारी आयटीबीपीकडे असते. तर, एसएसबी भारत-नेपाळ सीमेदरम्यान संरक्षण देते. एप्रिलमध्ये आयटीबीपीच्या जागी लष्कराला तैनात करण्यात आले होते. सामान्य परिस्थितीत आयटीबीपी हे सैन्याबरोबर संयुक्तपणे काम करते.