तिरुअनंतपुरम - कोरोना संकटात आदर्श आरोग्य सेवेचे उदाहरण केरळ राज्य सरकारने ठेवले आहे. केरळने खालच्या स्तरापर्यंत रुग्णालयांची उभारणी करून आणि वेगवेगळ्या विभागांमध्ये समन्वय साधून कोरोना सारख्या मोठ्या आव्हानावर नियंत्रण ठेवले आहे. राज्य कोरोना संकटात नाविन्यपूर्ण मार्ग विकसित करण्याच्या दृष्टीने अग्रभागी आहे. त्यामुळे कोरोना संकटानंतर राज्य इतर कोणत्याही संकटापासून वाचू शकेल, असे केरळचे मुख्यमंत्री पिनरायी विजयन यांनी शनिवारी सांगितले.
देशात कोरोनाचा प्रसार रोखण्यासाठी नवीन मार्ग विकसीत करण्यात केरळ आघाडीवर आहे. त्यामुळे येणाऱ्या कोणत्याही संकटाचा सामना करण्यासाठी केरळ सक्षम असल्याचे पिनरायी विजयन म्हणाले. केरळमध्ये सध्या आढळलेले कोरोनाबाधित हे राज्याबाहेरील आहेत. आम्ही त्यांच्यावरही उपचार करत आहोत, असेही त्यांनी सांगितले.
ट्विटर इंडिया द्वारा #AskTheCM हे ऑनलाईन अभियान राबवले आहे. याची सुरुवात पिनरायी विजयन यांनी केली. यावेळी परदेशातून केरळवासीयांची घरवापसी, रोजगाराचे प्रश्न, हवामानातील बदल, नैसर्गिक आपत्तीची शक्यता व त्यास सामोरे जाण्याची राज्याची तयारी, कृषी क्षेत्र, लॉकडाऊन यावर आधारित अनेक प्रश्नांना त्यांनी उत्तरे दिली.