श्रीनगर - जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशात पहिल्यांदाच एका तरुणाने स्थानिक कॅब सेवा सुरू केली आहे. आज(शुक्रवार) पासून काश्मीरमधील रस्त्यांवरून कॅब धावणार आहे. मागील वर्षी ऑगस्ट महिन्यात काश्मीरची स्वायत्तता काढून घेतल्यानंतर जनजीवन विस्कळीत झाले आहे. अर्थव्यवस्था कोलमडून पडली आहे. मात्र, श्रीनगरमधील युवकाने मोठी स्वप्ने घेवून आपला व्यवसाय थाटला आहे.
या कॅब सेवेचे नाव 'जेके कॅब्स' असे ठेवले असून ओला उबेर ज्या पद्धतीने काम करते तशीच सेवा देण्यात येणार आहे. श्रीनगरमधील उच्चशिक्षित फैजल शौकत या तरुणाने आपला स्वत:चा स्टार्टअप उद्योग सुरु केला आहे. या व्यवसायाद्वारे त्याने ३०० कॅब आणि टॅक्सी चालक आणि मालकांना एकत्र आणले आहे. फैजल याने बिझनेस मॅनेजमेंट म्हणजेच व्यवस्थापन शास्त्रातील आणि आयटीमधील पदवी घेतली आहे.
'आम्ही या सेवेद्वारे तीनशे कॅब, टॅक्सी चालक आणि मालकांना जोडले आहे. जम्मू काश्मीर केंद्रशासित प्रदेशातील नागरिकांना सुरक्षित, वाजवी दरात आणि तत्काळ कॅब सेवा देणार आहोत. या कामातून रोजगारही निर्माण झाला आहे, असे फैजल शौकतने सांगितले. तो श्रीनगरमधील संतनगरमधील रहिवासी आहे.
'कॅब सेवा सुरु करण्याच्या प्रकल्पावर मी मागील दोन वर्षांपासून काम करत आहे. मात्र, आर्थिक अडचणींमुळे काम पुढे गेले नाही. आता सर्व अडचणी दुर झाल्या असून शुक्रवारपासून कॅब सेवा आम्ही सुरु करत आहोत', असे फैजल म्हणाला.
'काश्मीरची स्वायत्तता रद्द केल्यानंतर स्थानिक आर्थिक अडचणींचा सामना करत आहेत. त्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. तसेच स्थानिक नागरिकांना विना त्रास कमी पैशांत कॅब सेवा देण्याचे उद्दिष्ट असल्याचे फैजल म्हणतो. ओला उबेर सारखी जेके कॅब सेवा ऑनलाईन तसेच ऑफलाईनही असेल'
'सर्वांना माहिती आहे, प्रवासी वाहतूकीत रिक्षावाल्यांची कशी मक्तेदारी आहे. ते मनमानी पद्धतीनं प्रवाशांकडून भाडे घेतात. या सगळ्याचा शेवट करण्यासाठी आम्ही नागरिकांच्या घरापर्यंत कॅब सेवा घेवून येत आहोत. आमच्या कॅब चालकांच्या कागदपत्रांची पोलिसांद्वारे तपासणी केली आहे. त्यामुळे नागरिकांनी सुरक्षेची चिंता करण्याची गरज नाही', असे फैजला म्हणाला. पुढे बोलताना त्याने सांगितले, अनुच्छेद ३७० आणि ३५ ए रद्द केल्यानंतर काश्मीरात पर्यटक नाहीत. त्यामुळे टॅक्सी चालक बेरोजगार झाले आहेत. आम्ही त्यांच्या सहकार्याने ही सेवा सुरु करत असून १४ रुपये किलोमीटर दराने कॅब चालकांना पैसे देणार आहोत.
'तुम्ही काश्मिरात कोणत्याही गोष्टीचे नियोजन करु शकत नाही. कधीही परिस्थिती बदलू शकते. त्यामुळे सुरुवातील आम्ही ऑफलाईन पद्धतीने कॅब सेवा सुरु करत आहोत. नागरिकांनी आमच्या टोलफ्री क्रमांकावर कॉल केल्यानंतर कॅब घरापर्यंत येईल. प्रवाशांना त्यानंतर कोणतेही प्रश्न चालकाकडून केले जाणार नाहीत, असे फैजलने सांगितले.
ऑक्टोबर महिन्यापर्यंत आमचे मोबाईल अॅप तयार असेल. टू जी स्पीडवरतीही चालेले, असे अॅप तयार करत आहोत. या अॅपद्वारे प्रवाशांना काश्मीरात कोठूनही कॅब बुक करता येईल, असे फैजलने सांगितले.