लखनौ - आपल्या पुतळे स्थापित करण्याची जनतेची इच्छा होती, असे स्पष्टीकरण बहुजन समाज पक्षाच्या सर्वेसर्वा मायावती यांनी सर्वोच्च न्यायालयाला दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाने पुतळ्यांच्याप्रकरणात त्यांना आज उत्तर देण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर मायावती यांनी शपथपत्र दाखल करुन वरील उत्तर दिले आहे.
मागच्या महिन्यात ८ तारखेला मायावतींच्या पुतळ्यांच्याप्रकरणावर सर्वोच्च न्यायालयात सुनावणी झाली होती. त्यावेळी सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश रंजन गोगोई यांनी मयावतींना तोंडी फर्मान सुनावले होते. तुम्ही हत्तींच्या पुतळेबांधण्यासाठी जनतेचा मोठा पैसा खर्च केलेला दिसतोय. आम्हाला वाटते की तुम्ही हा संपूर्ण पैसा परत करायला हवेत, असे सरन्यायाधीश म्हणाले होते. तसेच २ एप्रिलपर्यंत आपले उत्तर नोंदवण्यास सांगितले होते.
लोकसभा निवडणुकांसाठी मायावती तयारी करत आहेत. तर त्यांच्यावर नेहमीप्रमाणे पुतळ्यांच्याप्रकरणावरुन विरोधक आरोप करत आले आहेत. निवडणुकांच्या तोंडावर मायावतींच्या राजकारणावर या प्रकरणाचा काय परिणाम होणार हे पाहण्यासारखे झाले आहे.
मायावतींनी उत्तर प्रेदशमध्ये समाजवादी पक्षाशी आघाडी केली आहे. मागच्या निवडणुकांमध्ये त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती. मात्र, या आघाडीमुळे त्यांची स्थिती अत्यंत मजबूत असल्याचे म्हटले जात आहे. त्या काँग्रेसशी आघाडी करतील अशी चर्चा निवडणुकांपूर्वी होती. मात्र, मध्यप्रदेश आणि छत्तीसगडमध्ये त्यांनी काँग्रेस सोबत आघाडी करण्याचे टाळल्यानंतर उत्तर प्रदेशातही आघाडी केलेली नाही. एवढे असतानाही त्यांनी काँग्रेसचे जुने गड असलेले रायबरेली आणि अमेठी या जागा सोडल्या आहेत.