मलप्पुरम (केरळ) - आजच्या आधुनिक काळात मोबाईल आणि इंटरनेटचे माध्यम वेगवान संपर्कासाठी योग्य ठरत आहे. यात तुम्हाला कोणी पत्र लिहिण्यास सांगितल्यास आपण त्याकडे आश्चर्याने पाहू. केरळच्या मलप्पुरममधील सुब्बुलसुलाम उच्च माध्यमिक विद्यालयात ११ व्या वर्गात शिकणाऱ्या रेसबिनने पत्राद्वारे जगभरात अनेक मित्र जोडले. अशाप्रकारे दूर देशातील पत्राद्वारे जुळलेल्या लोकांना पेन फ्रेंड म्हणतात.
२१ व्या शतकाआधी पोस्टाची लाल पेटी आणि पोस्टमनने आणून दिलेल्या पत्राला खूप महत्व होते. लोक पत्राची आतुरतेने वाट पाहत असत. मात्र, मोबाईल आणि इंटरनेटच्या या सुपरफास्ट जगात पत्र हळूहळू मागे पडत गेले. आजच्या पिढीला पत्र, लाल टपाल पेटी किंवा पोस्टमनची तितकी गरज नाही किंवा आपुलकीही नाही. मात्र, घरातील वयोवृद्ध लोकांना त्याबाबत विचारल्यास आपल्याला अनेक रंजक किस्से ऐकायला मिळतील. आधुनिकतेमुळं जग जरी जवळ आलं असलं तरी माणसं भावनिकरित्या एकमेकांपासून दुरावलेत हेही तितकंच खरं आहे.
केरळच्या मलप्पुरममधील रेसबिन हिला पेपर क्राफ्टवर्क आणि डूडल्सची आवड आहे. तिने तयार केलेल्या कलाकृतींचे फोटो ती सोशल मीडियावर टाकत असते. तिच्या अशाच एका पोस्टवर अमेरिकेतील सारा नामक मुलीने आवड दाखवत बोलण्याची इच्छा व्यक्त केली. यावर रेसबिनने साराला तिचा पत्ता मागितला. यानंतर, काही महिन्यानंतर रेसबिनने साराला एक पत्र पाठवले. सारानेही याचे उत्तर पत्राद्वारे दिले आणि त्यांच्यात पत्रव्यवहाराला सुरुवात झाली.
रेसबिनने आधी साराशी पत्राद्वारे संपर्क साधला यानंतर अमेरिकेसह जपान, ब्रिटन, इंडोनेशिया, स्पेनसारख्या इतर देशात तिने पत्रांचे आदान-प्रदान सुरू केले. आज रेसबिनचे जगभरातील ४३ देशात जवळपास ४५ पेन फ्रेंड आहेत. रेसबिन आपल्या पत्रांची खूप उत्सुकतेने वाट पाहते.
रेसबिन आता हस्तलिखीत अंतर्देशीय पत्राऐवजी इमोटिकॉन्सचा वापर करते. हाताने लिहिलेल्या पत्रांची देवाणघेवाण करणे आणि त्याद्वारे विविध देशात पेन फ्रेंड बनविणे खूप रोमांचकारी अनुभव असल्याची भावना रेसबिनने व्यक्त केली आहे. ईमेल, मॅसेजिंग आणि फोन कॉलसारख्या सुविधा असतानाही पत्र पाठवून त्याचे उत्तर येण्याची वाट पाहणे हा एक वेगळाच अनुभव देऊन जातो, असे ती सांगते. जगभरातील विविध भागातल्या ४३ देशातील १५ ते २४ वर्षे वयोगटातील लोकांकडून तिला पत्र आणि लहान भेटवस्तू प्राप्त होत असतात.
या धावपळीच्या काळात तुम्हाला तुमची विचारपूस करणारे एक पत्र हाती लागणं हा खरचं एक सुखद अनुभव आहे. यात विशेष काय आहे असे जर तुम्हाला वाटत असेल तर आपणही एखादे पत्र लिहून याचा अनुभव घ्यायला हरकत नाही.