राजगढ - मध्य प्रदेशमधील राजगढ जिल्ह्यातील तलेनमध्ये शनिवारी युवक काँग्रेसच्या वतीने दांडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. या यात्रेत काँग्रेसचे नेते दिग्विजय सिंह हे देखील सहभागी झाले. यावेळी त्यांनी केंद्र सरकार व मोदींवर जोरदार निशाणा साधला. तसेच आपल्या कार्यकर्त्यांना देखील त्यांनी यावेळी सल्ला दिला. सध्या काँग्रेस झोपली आहे. झोपेतून जागे व्हा, उठा आणि कामाला लागा असं त्यांनी आपल्या कार्यकर्त्यांना उद्देशून म्हटले आहे.
काँग्रेस कार्यकर्त्यांना शेतकऱ्यांच्या आंदोलनात सहभागी होण्याचे आवाहन
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तीन नवे कृषी कायदे तयार केले आहेत. या कृषी कायद्याला शेतकऱ्यांचा विरोध आहे. नवीन कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे दिल्लीत आंदोलन सुरू आहे. हे शेतकरी गरीब आहेत, त्यांना त्यांचा हक्क मिळाला पाहिजे, त्यामुळे या आंदोलनात मोठ्या संख्येने सहभागी व्हा असे आवाहनही यावेळी दिग्विजय सिंह यांनी केले आहे.
शेतकऱ्यांच्या हक्कासाठी कॉंग्रेसकडून दांडी यात्रेचे आयोजन
नवीन कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या विरोधात आहेत. या कायद्यांमुळे शेतकऱ्यांचे नुकसान होत असल्याचा आरोप काँग्रेसकडून करण्यात आला आहे. यासाठी काँग्रेसच्या वतीने दांडी यात्रेचे आयोजन करण्यात आले होते. त्याचबरोबर मध्य प्रदेशात अतिवृष्टीमुळे सोयाबीनचे पीक वाया गेले आहे. यामध्ये शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान झाले, मात्र अद्यापही शेतकऱ्यांना मदत मिळाली नाही. शेतकऱ्यांना तातडीने मदत करावी अशी मागणीही यावेळी करण्यात आली. आजपासून सुरू झालेल्या या यात्रेची सांगता 28 डिसेंबरला भोपाळमध्ये होणार आहे.