श्रीनगर - जम्मू काश्मीरचे माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुक अब्दुल्ला यांनी आज पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना पत्र लिहले आहे. राज्यामध्ये 4-जी नेटवर्क सेवा सुरू करण्याची मागणी त्यांनी पत्रामध्ये केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये कोरोना बाधीत रुग्ण आढळला आहे. त्यामुळे खोऱ्यातील महत्त्वाची ठिकाणे बंद करण्यात आली आहेत. कलम 370 रद्द केल्यानंतर बंद केला होता. तेव्हा विद्यार्थ्यांना त्यामुळे त्रास सहन करावा लागला होता. आता पुन्हा एकदा खोरे बंद करण्यात आले आहे. लोकांना घरातून काम करावे लागत आहे. मात्र, 2-जी गतीमध्ये ते करणे शक्य नाही. त्यामुळे जम्मू काश्मीरमध्ये लवकरात लवकर 4-जी सेवा सुरू करावी, अशी मागणी त्यांनी केली आहे.
जम्मू काश्मीरमध्ये कलम 370 रद्द केल्यानंतर इंटरनेट बंद करण्यात आले होते. सात महिन्यांच्या बंदीनंतर जम्मू-काश्मीरमध्ये इंटरनेटवरची बंदी हटवण्यात आली होती आणि 2-जी नेटवर्क सुरू करण्यात आले होते.
दरम्यान 5 ऑगस्टला जम्मू-काश्मीरला विशेष दर्जा देणारे आर्टिकल ३७० हटवण्यात आले होते. त्यानंतर काश्मिरी नेत्यांना नजरकैदेत ठेवण्यात आले होते. नुकतच अधिकृत आदेश जारी करत जम्मू-काश्मीर सरकारने माजी मुख्यमंत्री आणि नॅशनल कॉन्फरन्स पक्षाचे नेते फारुक अब्दुल्ला यांची सुटका केली आहे.