भोपाळ - लॉकडाऊनमुळे सर्व शहरांमध्ये शांतता आहे. नागरिक घराबाहेर पडत नसल्याने भटक्या प्राण्यांच्या अन्नाचे हाल होत आहेत. अशातच मध्य प्रदेशमध्ये स्वयंसेवकांनी एकत्र येऊन भटक्या प्राण्यांसाठी मोहीम राबवली आहे. रुफी खान आणि आर्यन हे दोघेही रस्त्यावरील प्राण्यांच्या मदतीला धावले आहेत. यामध्ये अनेक भटक्या गायींचाही समावेश आहे.
लॉकडाऊनच्या परिस्थितीत विविध ठिकाणी गरजू व्यक्तींना मदत पुरवण्यात येत आहे. मात्र, भटक्या जनावरांना कोणताही आधार नसल्याचे रुफी खान म्हणाला. त्यामुळे आम्ही पुढाकार घेऊन ही योजना राबवल्याचे त्यांनी 'ईटीव्ही भारत'ला सांगितले. तसेच या प्राण्यांना लागणारे अन्न घरातच तयार करून ठिकठिकाणी ते पोहोचवत असल्याची माहिती रुफीने दिली. लहानपणापासून प्राणी मित्रांच्या संघटनेचा सदस्य असल्याने प्राण्यांची गोडी लागली. यातूनच भटक्या प्राण्यांसाठी काहीतरी करण्याची योजना आखल्याचे तो म्हणाला. यासाठी रुफीने सोशल मीडियामार्फत नागरिकांना आवाहन केले आहे.