नवी दिल्ली - भारत-चीन सीमा प्रश्नावर चर्चा करण्यासाठी संसदेचे ‘व्हर्च्युअल’ म्हणजेच ऑनलाइन अधिवेशन भरवावे, अशी मागणी काँग्रेसने केली आहे. यासोबतच कोरोना महामारी आणि इंधन दरवाढ, असे देशातील महत्त्वाच्या विषयांवरही चर्चा करण्यासाठी अधिवेशन भरविण्याची मागणी काँग्रेसने केली आहे.
महत्त्वाच्या विषयांवर चर्चा करण्यासाठी संसदेचे व्हर्च्युअल अधिवेशन भरवायला हवे. 1962 च्या चीन बरोबरच्या युद्धावेळी भाजप नेते अटल बिहारी वाजपेयी यांनी अधिवेशन भरवण्याची मागणी केली होती आणि ती सरकारने मान्य केली होती. याचा दाखला काँग्रेस प्रवक्ते पवन खेरा यांनी दिला. संसदीय समित्यांनीही बैठका घ्यायला हव्यात, असेही खेरा म्हणाले.
रशिया, भारत आणि चीनची बैठक ऑनलाइन झाली. तसेच जी 20 परिषद आणि सर्वपक्षीय बैठक व्हर्च्युअली झाली. सरकार नियमांपासून वाचण्याचा प्रयत्न करत आहे. संसदेपासून बचाव करण्याचा सरकारचा प्रयत्न सुरू आहे, असे काँग्रेस नेते मनिष तिवारी म्हणाले.
संसदेत संपूर्ण अधिवेशन घेणे शक्य नाही, हे समजू शकतो. मात्र, जगभरातील अनेक संसद व्हर्च्युअली बैठका घेत आहेत. इंग्लड आणि पोर्तुगाल देशात व्हर्च्युअल बैठका होतात. पण संसदेची संरक्षणविषयक स्थायी समिती का भेटू शकत नाही? संरक्षणासंबधीची सल्लागार समिती का भेटू शकत नाही? आरोग्यविषय समितीच्याही बैठका होत नाहीत, असे तिवारी म्हणाले.
यातून भाजपची अधिकारशाही वृत्ती दिसून येते. विरोधी पक्षाद्वारे नागरिकांनी विचारलेल्या प्रश्नांपासून दूर पळण्यासाठी भाजप संसदेचे अधिवेशन आणि बैठका घेत नाही, असा आरोप काँग्रेसने केला.