नवी दिल्ली - केरळ विमान दुर्घटनेत मृत्यू झालेल्या एअर इंडिया एक्सप्रेसच्या वैमानिकांनी शुक्रवारी संध्याकाळी कोझिकोड येथे टॅबलेटॉप रनवेवर अंतिम लँडिंगपूर्वी दोन वेळा विमान उतरवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वारे विमानाच्या दिशेने वाहत असल्याने वैमानिकांकडून दोन वेळा लँडिंग रद्द करण्यात आल्याची माहिती डिजीसीएच्या वरिष्ठ अन्वेषकांनी वृत्त संस्थांना दिली आहे.
दुबईहून निघालेल्या एअर इंडियाच्या फ्लाइट आयएक्स -१३४४, B७३७ हे प्रवासी विमान कालीकतच्या विमानतळावर उतरणार होत. या टेबलटॉप धावपट्टीवर अंतिम लँडिंगआधी दोन वेळा विमान उतरण्याचा प्रयत्न झाल्याचे डीजीसीएच्या वरिष्ठ अन्वेषकांनी सांगितले. वैमानिकांनी २८ रन-वे वर विमान लँड करण्याचा प्रयत्न केला मात्र त्यावेळी मुसळधार पाऊस सुरू होता. तसेच वारा विमानाच्या दिशेने वाहत असल्यामुळे धावपट्टीचा अचूक अंदाज न आल्याने संबंधित दुर्घटना घडल्याचे तपास अधिकाऱ्यांनी सांगितले.
एअर इंडियाचे आयएक्स १३४४, बी७३७ हे दुबई ते कालीकत प्रवासी विमान वंदे मातरम् मिशनच्या अंतर्गत काम करत होते. एकूण १९० प्रवासी यातून प्रवास करत होते. अपघाताच्या वेळी विमानाची गती जास्त होती. त्यामुळे धावपट्टीच्या शेवटपर्यंत ते गेले; आणि दरीत कोसळून विमानाचे दोन तुकडे झाले. आतापर्यंत जवळपास १८ प्रवाश्यांचा मृत्यू झाल्याचे समोर आले आहे. यामध्ये दोन्ही वैमानिक देखील मृत्यूमुखी पडले आहेत.
आतापर्यंत १८४ प्रवासी आणि सहा विमान कर्मचारी ओळख पटली असून अद्याप अधिकृत आकडेवारी निश्चित नसल्याचे एअर इंडियाने सांगितले. तसेच दोन्ही वैमानिकांचा दुर्दैवी मृत्यू झाला असून त्यांच्या कुटुंबीयांच्या संपर्कात असल्याचे एअर इंडियाने म्हटले आहे.
शुक्रवारी सायंकाळी ७.४० वाजता हा अपघात झाला. विमानतळ ऑथोरिटीने तत्काळ बचाव कार्य पूर्ण केले असून सर्व जखमींना केरळमधील विविध रुग्णालयांत दाखल करण्यात आले. अपघाताची बातमी कळताच आपत्कालीन कमांड सेंटर त्वरित सक्रिय करण्यात आले.