नवी दिल्ली - उत्तर प्रदेशातील उन्नाव बलात्कार प्रकरणात पेटवून दिलेल्या पीडितेची अखेर मृत्यूशी झुंज संपली. दिल्लीच्या सफदरगंज रुग्णालयात तिने अखेरचा श्वास घेतला. त्यावरून उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे अध्यक्ष अखिलेश यादव आणि ईतर नेते दिल्ली विधानभवनासमोर धरणे प्रदर्शन करत आहेत.
हैदराबाद घटनेनंतर देशामध्ये संताप उसळला होता. त्यानंतर पुन्हा उन्नावमध्ये तीच घटना घडली आहे. पीडित मुलीची जिवंत राहण्याची इच्छा होती. मात्र, डॉक्टरांच्या प्रयत्नानंतरही ती वाचू शकली नाही. एक मुलगी न्याय मागत होती. तो आम्ही तीला देऊ शकलो नाही. हा आमच्यासाठी एक काळा दिवस आहे, असे अखिलेश यादव म्हणाले.
उत्तर प्रदेश सरकारच्या राजवटीतली ही पहिली घटना नाही. यापुर्वी एका पीडितीने न्याय मिळावा यासाठी मुख्यमंत्री आदित्यनाथ यांच्या घरासमोर आत्महत्येचा प्रयत्न केला होता. त्या मुलीने आपला पुर्ण कुटुंब गमावले. याप्रकरणामध्ये भाजपाचा दोष होता, अशी टीका अखिलेश यांनी केली.
राज्यातील कायदा व सुव्यवस्था सुधारली जाईल. जो अपराध करेल त्याला शिक्षा होईल, असे मुख्यमंत्री सदनामध्ये बोलतात. मात्र, आरोपींवर कारवाई करत नाहीत. कारण, ज्या लोकांवर आरोप आहे. ते लोक भाजप पक्षाचे आहेत, अशी टीका त्यांनी भाजपवर केली.
भाजप सरकारमध्ये मुली सुरक्षित नाहीत. जोपर्यंत उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री, गृहसचिव राजीनामा देत नाहीत तोपर्यंत पीडितेला न्याय मिळणार नाही. उन्नाव बलात्कार प्रकरणी आम्ही संपूर्ण राज्यात शोकसभा घेणार आहोत, असे अखिलेश यांनी सांगितले.
यापुर्वी उन्नावमधील एका मुलीवर सामूहिक बलात्कार झाला होता. याप्रकरणी भाजपचा आमदार कुलदीप सेंगर त्याचा भाऊ मनोज सिंह सेंगर आणि इतर ८ जणांविरोधात पोलिसांमध्ये तक्रार दाखल झाली होती.