चेन्नई : तामिळनाडू विधानसभेसाठी उभे राहिलेले आमचे उमेदवार हे 'आयएसआय प्रमाणित' आहेत. तर, द्रमुकचे उमेदवार हे नकली असल्याचे वक्तव्य राज्याचे मुख्यमंत्री के. पलानीस्वामी यांनी केले आहे. त्यामुळे मतदारांनी अशा नकली उमेदवारांवर विश्वास ठेऊ नये असेही ते म्हणाले. ते करुरमध्ये राज्यमंत्री एम. आर. विजयभास्कर यांच्यासाठी आयोजित केलेल्या प्रचारसभेत बोलत होते.
करुर अण्णाद्रमुकचा बालेकिल्ला..
पलानीस्वामी यावेळी म्हणाले, की "विजयभास्कर यांना इथले लोक सहजपणे स्वीकारतील. अम्मांनी (जयललिता) त्यांना वाहतूक मंत्र्याचे पद दिले होते. या मतदारसंघातील लोकांच्या विकासासाठी ते सातत्याने प्रयत्न करत आले आहेत. करुर हा एआयएडीएमकेचा बालेकिल्ला आहे", असेही ते म्हणाले. तसेच, या मतदारसंघातील द्रमुकचे उमेदवार सेंथिल बालाजी यांना भ्रष्ट म्हणत पलानीस्वामींनी त्यांच्यावर टीका केली.
सेंथिल बालाजी भ्रष्टाचारी..
"स्टॅलिन आमच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप करतात, मात्र त्यांचा उमेदवार बालाजी यानेच मोठ्याच प्रमाणात भ्रष्टाचार केला होता. त्यामुळे अम्मांनी त्याला बाहेर हाकलले होते. बालाजीने आमचे सरकार पाडण्याचा प्रयत्न केला होता. मात्र इतिहास साक्षी आहे, की नेहमी धर्माचाच विजय होतो. बालाजी यांनी आतापर्यंत पाच पक्ष बदलले आहेत", असेही पलानीस्वामी म्हणाले.
तामिळनाडूमध्ये सहा एप्रिलला विधानसभा निवडणुकांसाठी मतदान पार पडेल. तर २ मे रोजी मतमोजणी होणार आहे. विधानसभेच्या २४३ जागांसाठी होणाऱ्या या निवडणुकीमध्ये काँग्रेस-द्रमुक आणि भाजप-अण्णाद्रमुक यांमध्ये मुख्य लढत असणार आहे.
हेही वाचा : ..अन् पंतप्रधानांनी धरले कार्यकर्त्याचे पाय; पाहा व्हिडिओ