महाराष्ट्र

maharashtra

विदर्भातील पावसाच्या झडीनं जलपातळी वाढली, शेतकऱ्यांनी 'ही' घ्यावी काळजी - Water level increased in Vidarbha

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 1, 2024, 6:20 PM IST

गेल्या चार ते पाच दिवसांपासून अमरावतीसह विदर्भात वरुणराजानं दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळं पाणी पातळीत वाढ झाली असून पीकांना मोठा दिलासा मिळाला आहे. पावसाच्या झडीचं कारण काय? त्याचा परिणाम काय होणार? हे जाणून घ्या.

Amravati continuous rains
अमरावतीत रिमझिम पवासाचा जोर कायम (Etv Bharat Reporter)

अमरावती :विदर्भात लुप्त झालेली पावसाची झड यावर्षी अमरावतीसह विदर्भातील अनेक जिल्ह्यांना सुखद अनुभव देणारी ठरली. अमरावतीसह विदर्भात सलग अकरा दिवसांपासून पडणाऱ्या रिमझिम पवासामुळं पाणी पातळीत वाढ झाली आहे. त्यामुळं शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

प्रा. राजेंद्र पाटील यांची प्रतिक्रिया (ETV BHARAT Reporter)

सलग दहा दिवस रिमझिम पाऊस :19 ते 28 जुलै दरम्यान सलग दहा दिवस विदर्भातील बहुतांश जिल्ह्यात रिमझिम पाऊस बरसला. गेल्या काही वर्षांपासून पावसाची अशी झड बंदच होती. अचानक येणारा मुसळधार पाऊस, विजांचा कडकडाट, एका रात्रीत नदी नाल्यांना येणारा पूर अशी परिस्थिती गत तीन-चार वर्ष अमरावती जिल्ह्यात विविध भागात पावसाळ्यात होती. यावर्षी 10 जुलैपर्यंत पावसाचा पत्ताच नव्हता. मात्र 10 जुलैनंतर अमरावती जिल्ह्यातील चांदूरबाजार तालुक्यात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. यामुळं शेतीचं मोठं नुकसान देखील झालं. 17 जुलैनंतर पावसानं रंगच बदलला. 19 जुलैपासून सलग 29 जुलैपर्यंत अमरावती जिल्ह्यात सर्व तालुक्यांमध्ये पावसाची झड सुरू होती. दहा दिवसाच्या सलग झडीमुळं जिल्ह्यातील सर्व नदी नाल्यांना पाणी आलं. विशेष म्हणजे शेतीसाठी हा पाऊस अतिशय उपयुक्त ठरला.

  • शेतकऱ्यांना मोठा दिलासा :यावर्षी 10 जुलैपर्यंत विदर्भात पाऊस नव्हता. त्यानंतर मात्र काही भागात ढगफुटी सदृश्य पाऊस कोसळला. त्यानंतर 19 जुलैपासून सलग दहा दिवस पावसाची झड होती. त्यामुळं पावसाचा शेतीला चांगला फायदा झाला. कापूस, तूर मूग , उडीद सोयाबीन अशी पीक या पावसामुळं शेत-शिवारात बहरली आहेत.

वातावरणात निर्माण झाला गारवा :29 जुलैच्या आधी अनेक भागात मुसळधार पाऊस बरसला. अमरावती शहर, जिल्ह्यात देखील विजांच्या कळकळाटांसह तीन-चार वेळा पाऊस बरसला. पाऊस होऊनदेखील वातावरणातील उकाडा कायम होता. 19 जुलैपासून पावसाची झड सुरू झाल्यानंतर वातावरणात छान गारवा निर्माण झाला. पावसाच्या झडीमुळं डोंगर हिरवेगार झाले असून नदी आणि नाले खळखळ वाहत आहेत.

पावसाच्या झडीचं काय आहे कारण : "मुसळधार पाऊस, अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यांसह पाऊस असे पावसाचे विविध प्रकार आहेत. याच प्रकारात रिमझिम पावसाचादेखील समावेश होता. रिमझिम पावसाच्या झडीचं वैशिष्ट्य म्हणजे या झडीदरम्यान विजांचा कडकडाट होत नाही. वातावरणात अधिक प्रमाणात आद्रता असली, की अधिक पाऊस देणारे ढग आकाशात तयार होतात. 80 ते 90 टक्क्यांपेक्षा अधिक आद्रता असणाऱ्या ढगांना थंड हवेचा स्पर्श होताच, या ढगांमधून रिमझिम पाऊस बरसतो. त्यामुळं सलग आठ दहा दिवस संततधार पाऊस कोसळतो," अशी माहिती हवामानतज्ञ डॉ. सचिन मुंडे यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिली.

शेतकऱ्यांनी घ्यावी काळजी : "रिमझिम पाऊस हा शेतीसाठी अतिशय उपयुक्त असला तरी पावसाची झड असल्यास पिकांच्या मुळाशी पाणी साठतं. त्यामुळं शेतकऱ्यांना योग्य नियोजन करावं लागतं. पिकांच्या मुळाशी ऑक्सिजनचा प्रवाह थांबला, तर मुळांना बुरशी लग्नाची शक्यता असते. यामुळं नुकसान होण्याचा धोका असतो. हे टाळण्यासाठी शेतकऱ्यांनी योग्य नियोजन करणं गरजेचं आहे," असा सल्ला शिवाजी कृषी महाविद्यालयाचे प्रा. राजेंद्र पाटील यांनी 'ईटीव्ही भारत' शी बोलताना दिला.

पाण्याची पातळी वाढली :"जुलै महिन्यात पावसाची झड लागल्यामुळं मोठ्या प्रमाणात पाणी जमिनीत मुरतं. यामुळं जमिनीखाली पाण्याची पातळी वाढती. अमरावती शहरासह जिल्ह्यातील जवळपास सर्वच भागात विहिरी, तलाव आणि धरणं तुडूंब भरली आहेत. मात्र, गेल्या काही वर्षात वाढत्या तापमानामुळं पावसाची झड जणू हरवली होती. आता या पावसाच्या झडीमुळं जमिनीत पाणी चांगलं झिरपतयं. त्यामुलं भूजल पातळी वाढली आहे. पिण्यासह उद्योगासाठी देखील आता मुबलक पाणी उपलब्ध होणार आहे," असं देखील पाटील म्हणाले.

  • आणखी चार दिवस पावसाची झड :"जुलै महिन्यात सलग दहा दिवस पावसाची झड होती. आता पुन्हा एक ऑगस्ट ते 4 ऑगस्टपर्यंत विदर्भात बऱ्याच ठिकाणी पावसाची झड राहणार आहे," असा अंदाज शिवाजी कृषी महाविद्यालयातील हवामान विभाग प्रमुख प्रा. अनिल बंड यांनी व्यक्त केला.

'हे' वाचलंत का :

  1. मुसळधार पावसामुळं उत्तराखंडमध्ये दहा जणांचा मृत्यू; हिमाचलमध्ये ढगफुटीमुळं 50 जण बेपत्ता, केदारनाथ यात्रा स्थगित - Cloudbursts in Uttarakhand Himachal
  2. वायनाड भूस्खलन दुर्घटनेतील मृतांचा आकडा 250 वर; मदत आणि बचाव कार्य सुरूच - Wayanad Landslide Rescue Operations
  3. ​निसर्गामुळे आपण आहोत, त्यामुळे निसर्ग जपा...; जागतिक निसर्ग संवर्धन दिनानिमित्त 'या' गोष्टी नक्की करा - World Nature Conservation Day 2024

ABOUT THE AUTHOR

...view details