महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

मद्यपींनी वेटरवर फेकला ग्लास, पोलिसांना शिवीगाळ करत धक्काबुक्की, तिघांना ठोकल्या बेड्या - RESTAURANT BILL DISPUTE

ठाण्यातील एका रेस्टॉरंटमध्ये मद्यपींनी धुमाकूळ घातल्याचं समोर आलं आहे. वेटर बिल देण्यासाठी गेला असता, त्याच्यावर ग्लास फेकून हल्ला केल्याची घटना समोर आली आहे.

RESTAURANT BILL DISPUTE
मद्यपींचा धुमाकूळ (Source - ETV Bharat)

By ETV Bharat Marathi Team

Published : Dec 1, 2024, 10:34 PM IST

ठाणे :ठाण्यातील एका रेस्टॉरंटमधून धक्कादायक घटना समोर आली आहे. येथील सूर संगीत बार आणि रेस्टॉरंटमध्ये काहीजण मद्यप्राशन करण्यासाठी आले होते. मद्यप्राशन केल्यानंतर वेटर त्यांना बिल देण्यासाठी गेला असता, त्यांनी त्याच्यावर ग्लास फेकून हल्ला केला. घटनेची माहिती मिळताच, पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मद्यपींनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. त्यानंतर पोलिसांनी मद्यपींना चोप देत पोलीस ठाण्यात आणलं. या घटनेप्रकरणी हॉटेलच्या वेटरद्वारे आणि पोलिसांद्वारे असे दोन गुन्हे दाखल करण्यात आले असून तीनही आरोपींना बेड्या ठोकण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली.

बिल देण्यास नकार : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, विशाल अरुण राय (वय - 29 वर्ष), मनोज विष्णू तिवारी(वय - 38 वर्ष) रा. वागळे इस्टेट ठाणे, योगेश लोकनाथ पाठक (वय - 32 वर्ष) अशी आरोपींची नावं आहेत. तीनही आरोपी रेस्टॉरंटमध्ये मद्यप्राशन करण्यासाठी आले होते. मद्यप्राशन केल्यानंतर रेस्टॉरंटमधील वेटर बिल देण्यासाठी गेला, त्यावेळी आरोपींनी बिल देण्यास नकार दिला. बिल मागणाऱ्या वेटरवर काचेचं ग्लास फेकून त्याच्यावर हल्ला करण्यात आला. माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले. मद्यपींनी यावेळी पोलीस कर्मचाऱ्यांनाही शिवीगाळ करत धक्काबुक्की करण्याचाही प्रयत्न केला. तीनही आरोपींना ताब्यात घेत अटक केली.

एकाच घटनेत दोन गुन्हे दाखल : मद्यपींनी हॉटेलच्या वेटरवर हल्ला केल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर याच तरुणांवर पोलीस रवींद्र राठोड यांनी दिलेल्या तक्रारीवरून, शांतता भंग केल्याप्रकरणी आणि पोलिसांना कर्तव्य बजावत असताना त्यांना केलेल्या धक्काबुक्की प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अशाप्रकारे या एकाच घटनेत दोन गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. घडलेल्या प्रकारानंतर पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी तातडीनं घटनेची दखल घेत दोन विविध गुन्हे दाखल केले. तिघंही नियंत्रणात येत नसल्यामुळं शेवटी त्यांना पोलिसी खाक्या दाखवणं गरजेचं होतं, असं पोलीस उपायुक्त प्रशांत कदम यांनी सांगितलं.

हेही वाचा

  1. मेळघाट परिसरातील वाघाच्या मृत्यू प्रकरणी चार आरोपींना अटक; दगावला की घातपात?
  2. "नाना पटोले आरएसएसचे एजंट", काँग्रेसच्या पराभूत उमेदवाराचा हल्लाबोल, पक्षानं धाडली नोटीस
  3. "माझी प्रकृती ठीक"; एकनाथ शिंदे ठाण्यात परतले, राजकीय घडामोडींना वेग

ABOUT THE AUTHOR

...view details