अहिल्यानगर :संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथं शुक्रवारी (25 ऑक्टोबर) रात्री सुजय विखे यांच्या सभेत वसंतराव देशमुख यांनी जयश्री थोरातांबाबत केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर मोठ्या प्रमाणात विखे समर्थकांच्या गाड्यांची तोडफोड व जाळपोळ झाली होती. भाजपा नेते राधाकृष्ण विखे पाटील यांनी आज (27 ऑक्टोबर) संगमनेरमध्ये कार्यकर्त्यांची बैठक घेऊन थोरात यांची कन्या जयश्री यांनी गेल्या दोन दिवसांत केलेल्या आरोपांची उत्तरं दिली.
जयश्री थोरातांनी यात पडू नये : "जयश्री थोरात लहान आहेत, त्यांना अजून बरंच काही शिकायचं, त्यांनी यात पडू नये. आम्ही माफी मागावी असं जयश्री थोरात म्हणत आहेत. आमच्या गाडीतील महिला कार्यकर्तांना मारहाण झाली, याबद्धल त्यांचे वडील बाळासाहेब थोरात माफी मागणार का?" असा थेट सवाल राधाकृष्ण विखे पाटलांनी केलाय. "संगमनेर तालुक्यात राजकीय दहशतवाद निर्माण केले जात असून स्वतःला सुसंस्कृत म्हणतात आणि जाळपोळ करतात ही तुमची कोणती संस्कृती आहे," असा टोला राधाकृष्ण विखेंनी थोरतांना लागवलाय.
अर्ध्या तासात गुंड जमा : "संगमनेर विधानसभा मतदारसंघात महायुतीचा उमेदवार कोण यासंदर्भात आपण विचार केला पाहिजे. सगळे मिळून तुम्ही या दहशतवादाविरोधात भुमिका घेत नाही तोपर्यंत हे असंच चालणार आहे. संगमनेर तालुक्यातील धांदरफळ येथं सभेत वसंत देशमुख जे बोलले त्याचा आम्ही निषेध करतो. सभा झाल्यानंतर सुजय विखेंवर प्राणघातक हल्ला करण्याच्या कटाचा मास्टमाईंड कोण? सभा झाल्यानंतर अर्ध्या तासात गुंड जमा होतात. त्यामुळं हे षडयंत्र असून सुजय विखेंना मारण्याचा डाव होता," असा पलटवार राधाकृष्ण विखे पाटलांनी थोरातांवर केलाय. स्वतःला सभ्य म्हणुन राज्यात फिरायचं आणि इकडे दहशत निर्माण करायची, ही कोणती संस्कृती असा थेट सवाल राधाकृष्ण विखेंनी बाळासाहेब थोरतांना केलाय.