महाराष्ट्र

maharashtra

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 17, 2024, 6:21 PM IST

ETV Bharat / state

Nyay Sankalp Sabha : भारत हा मोहब्बत वाला देश, मग द्वेष का पसरवला जातोय?- राहुल गांधी

Nyay Sankalp Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांच्या नेतृत्वाखाली काढण्यात आलेल्या भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप झाला. राहुल गांधी यांनी रविवारी (17 मार्च) सकाळी दक्षिण मुंबईतील महात्मा गांधींच्या घर मणि भवन येथून न्याय संकल्प पदयात्रा काढली. या यात्रेत काँग्रेस महासचिव प्रियंका गांधी आणि महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधीही सहभागी झाले होते. या पदयात्रेनंतर घेतलेल्या सभेनंतर राहुल गांधींनी भाजपावर हल्लाबोल केला.

Nyay Sankalp Sabha Rahul Gandhi Criticized BJP says  India is country of love BJP spreads hatred
काँग्रेस नेते राहुल गांधी

मुंबई Nyay Sankalp Sabha : काँग्रेस नेते राहुल गांधी यांची मणिपूरपासून सुरू झालेली भारत जोडो न्याय यात्रा 6,700 किलोमीटरचे अंतर पार करून मुंबईत पोहोचली आहे. आज (17 मार्च) सकाळीच काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातील महात्मा गांधी यांचे निवासस्थान असलेल्या मणी भवन येथून न्याय संकल्प पदयात्रा काढली. या यात्रेनंतर राहुल गांधी यांनी नजीकच्या तेजपाल भवन येथे नागरिक न्याय सभा घेतली. या सभेत बोलताना राहुल गांधी यांनी 'भारत हा मोहब्बत वाला देश आहे, मग द्वेष का पसरवला जात आहे?' असा सवाल भाजपाला केला आहे. या देशातील गरीब, शेतकरी, दलित, महिला आणि तरुणांवर रोज अन्याय होत आहे. त्यांच्या प्रश्नांवर कुणीही आवाज उठवू नये, यासाठी समाजा समाजात द्वेष पसरवला जात आहे' अशी टीकाही त्यांनी केली.



काय म्हणाले राहुल गांधी? : या सभेत बोलताना राहुल गांधी म्हणाले की, "भारत जोडो यात्रेचा आज समारोप दिवस आहे. पण, हा शेवट नसून न्यायाच्या लढ्याची ही सुरुवात आहे. मी सुरुवातीला कन्याकुमारी ते काश्मीर पायी यात्रा केली. त्यानंतर दुसरा टप्पा मणिपूर ते मुंबई असा प्रवास केला. या प्रवासात मला आपल्या भारताचं एक वेगळच रूप पाहायला मिळालं. माझ्या डोक्यामध्ये आपल्या देशाचे जे चित्र होतं ते आणि ग्राउंडवरचा आपला देश यात प्रचंड तफावत असल्याचं मला जाणवलं. या प्रवासादरम्यान, प्रत्येक वर्गावर होत असलेले भयंकर अन्याय आणि अत्याचार आणि त्यांच्या समस्या मी जवळून पाहिल्या आणि समजून घेतल्या आहेत. देशवासीयांच्या आशावादी डोळ्यात लपलेली छोटी-छोटी स्वप्न मी माझ्यासोबत घेऊन जात आहे. या प्रवासानं माझा विश्वास आणखी दृढ केलाय, की देशाची पहिली गरज ही न्याय आहे. तसंच प्रत्येक घटकाला समर्पित काँग्रेसचे 5 न्याय हे आपल्या देशाला समस्यांमधून बाहेर काढू शकतात", असा विश्वास देखील राहुल गांधी यांनी व्यक्त केला आहे.

राज्यघटना बदलण्याची त्यांच्यात हिंमत नाही : पुढं ते म्हणाले की, "सत्ताधारी भारतीय जनता पक्ष देशाचे संविधान बदलणार असं बोललं जात आहे. पण, राज्यघटना बदलण्याची हिंमत त्यांच्यात नाही. कारण, सत्य आणि देशातील जनता इंडिया आघाडी सोबत आहे. ही लढाई केवळ भाजपी आणि काँग्रेसमधील नसून दोन अभिव्यक्तींमधील आहे. देशात एकाधिकारशाही हवी, एकच सत्ता केंद्र असायला हवं अशी भाजपाची विचारधारा आहे. याउलट सत्तेचं विकेंद्रीकरण व्हावे आणि जनतेचा आवाज ऐकला जावा, असं आम्हाला वाटतं. जर एखाद्या व्यक्तीकडं आयआयटीची पदवी असेल तर त्याचा अर्थ असा नाही की त्याला एखाद्या शेतकऱ्यापेक्षा जास्त ज्ञान आहे", असा घणाघात राहुल गांधी यांनी भाजपावर केला.

हेही वाचा -

  1. Nyay Sankalp Padyatra : मुंबईत काँग्रेसची 'न्याय संकल्प पदयात्रा', यात्रेत महात्मा गांधी यांचे पणतू तुषार गांधी सहभागी
  2. Bharat Jodo Nyay Yatra: 90 टक्के लोकसंख्या अन्यायामुळे त्रस्त-राहुल गांधी
  3. Rahul Gandhi : भारत जोडो न्याय यात्रेचा मुंबईत समारोप; राहुल गांधींचा पंतप्रधानांवर हल्लाबोल, म्हणाले, "अदानीच्या मागे..."

ABOUT THE AUTHOR

...view details