महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

दोन विवाहित महिलांचं 'सूरज'सोबत लफडं; वादातून एकीनं केली दुसरीची हत्या

दोन विवाहित महिलांचं एका युवकासोबत प्रेमसंबंध होते. 'तो' कोणाचा यावरुन दोघींमध्ये वाद झाला आणि एका महिलेची दुसरीनं हत्या केली. 'फिल्मी स्टाईल' प्रकार अमरावतीत घडलाय.

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Triple Love Murder Case
पोलिसांनी अटक केलेले आरोपी (Source - ETV Bharat Reporter)

अमरावती :शहरात नवीन महामार्गावर असणाऱ्या श्रीकृष्ण मंदिराजवळ मंगळवारी सायंकाळी एका महिलेची दुसऱ्या महिलेनं हत्या केल्यानं खळबळ उडाली. या दोन्ही महिला विवाहित असून, या दोघींचंही सूरज देशमुख नावाच्या युवकासोबत मागील सात, आठ वर्षांपासून प्रेमसंबंध होते. या दोघींनाही सूरज केवळ आपल्यासोबत राहावा, असं वाटत असल्यामुळं एकीनं दुसरीची हत्या केली असल्याचं पोलीस तपासात समोर आलं.

असा आहे संपूर्ण प्रकार : नवीन महामार्गावर शुभांगी या महिलेची सीमा या महिलेनं हत्या केल्याची घटना मंगळवारी सायंकाळी घडली. त्रिकोणी प्रेम प्रकरणातून हा प्रकार झाला असल्याचं पोलीस तपासात स्पष्ट झालं. या प्रकरणात पोलिसांनी आरोपी सीमा आणि सूरज देशमुख यांना अटक केली. अमरावती जिल्ह्यातील कुऱ्हा येथील रहिवासी सूरज देशमुख याचं चांदूर रेल्वे तालुक्यातील एका गावातील रहिवासी असणारी महिला सीमा आणि वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथील रहिवासी शुभांगी या दोन्ही महिलेसोबत प्रेमसंबंध होते. या दोघी विवाहित असून, दोघीही नवऱ्यापासून विभक्त राहतात. या दोघींनाही सूरज देशमुख यानं अमरावतीत विविध भागात भाड्यानं घर देखील करून दिलं. दोघीही परिसरात धुणी- भांडी घासण्याचं काम करायच्या. सूरजचं दोन्ही महिलांसोबत असणारे संबंध दोघींनाही माहिती होते. मागील काही दिवसांपासून मात्र या दोघींमध्ये सूरजवरून खटके उडायला लागले. तिघांमध्ये सुरू असणारा हा वाद संपुष्टात यावा यासाठी मंगळवारी तिघांनीही भेटून तोडगा काढण्याचा ठरवलं.

पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली माहिती (Source - ETV Bharat Reporter)

मंगळवारी नेमकं काय घडलं? :शुभांगी, सूरज आणि सीमा यांचं मंगळवारी भेटायचं ठरलं होतं. शुभांगी मंगळवारी सकाळीच आर्वीवरून अमरावतीला आली. तिच्यासोबत राजेश्री ही मैत्रीण होती. दुपारी या दोघीही पंचशील नगर परिसरात राहणाऱ्या प्रज्ञा या मैत्रिणीकडं गेल्या होत्या. दुपारी चारच्या सुमारास सूरज यानं शुभांगीला कॉल करून बियाणी चौकात भेटायला बोलावलं. शुभांगी आणि राजेश्री सूरजला भेटायला बियाणी चौकात पोहोचल्या. यावेळी सूरजन सीमाला भेटायला नवीन महामार्गावर असणाऱ्या कृष्ण मंदिराजवळ बोलावलं. त्यानंतर शुभांगी आणि राजेश्री या दोघींनाही तिथं नेलं.

महिलेची केली हत्या : कृष्ण मंदिराजवळ सीमा ही सूरज आणि शुभांगी दोघांनाही भेटायला आली. यावेळी शुभांगी आणि सीमा यांच्यात हाणामारी झाली. या दरम्यान सीमानं घरगुती वापरातील चाकू काढून शुभांगीच्या खांद्यावर आणि गळ्याजवळ वार केले. शुभांगी जखमी अवस्थेत खाली पडताच सीमानं घटनास्थळावरून पळ काढला. सूरज देखील पळायच्या तयारीत होता. मात्र, शुभांगीची मैत्रीण राजेश्री हिनं त्याला जाऊ दिलं नाही. राजेश्रीनं महामार्गावरून जाणारा एक ट्रक थांबवला. ट्रक चालकाच्या मदतीनं सूरजनं जखमी अवस्थेत असणाऱ्या शुभांगीला दुचाकीवरून जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं.

सूरजनं रुग्णालयातून काढला पळ : डॉक्टरांनी शुभांगीला मृत घोषित करताच घाबरलेल्या सूरज देशमुखनं जिल्हा सामान्य रुग्णालयातून पळ काढला. त्यानंतर शुभांगीची मैत्रीण राजेश्रीनं रुग्णालयात पोहोचलेल्या पोलिसांना सूरजबाबत माहिती दिली. पोलिसांनी पाठलाग करून त्याला मालटेकडीजवळ पकडलं. शुभांगीची मैत्रीण राजेश्रीच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला.

मुख्य आरोपीला अटक : पोलिसांनी सूरज देशमुख याला अटक केल्यावर त्याची चौकशी करून मुख्य आरोपी सीमाबाबत माहिती मिळाली. बुधवारी सकाळी सीमा ही चांदूर रेल्वे बसमध्ये बसण्याच्या प्रयत्नात असताना पोलिसांनी तिला ताब्यात घेतलं. पोलिसांनी सीमाला आरोग्य तपासणीसाठी जिल्हा सामान्य रुग्णालयात नेलं असता तिचा हात फ्रॅक्चर असल्यानं तिच्या हाताला डॉक्टरांनी प्लास्टर बांधून दिलं. दोन्ही आरोपी आता राजापेठ पोलिसांच्या ताब्यात असून, या दोघांचीही चौकशी केली जाणार असल्याची माहिती पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांनी दिली.

हेही वाचा

  1. प्रेमात ठार! भेटायला का आलीस म्हणत तरुणीनं मित्राच्या प्रेयसीची केली हत्या
  2. दुहेरी हत्याकांड! पैशाच्या वादावरुन दिरानं केला भावजयींचा खून, अहिल्यानगरमध्ये खळबळ
  3. नागपूर रेल्वे स्थानकातील प्रवाशांवर मनोरुग्णानं केला हल्ला; दोघांचा जागीच मृत्यू - Nagpur Railway Station Attacked

ABOUT THE AUTHOR

...view details