महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

"स्वस्थ आणि समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी...", पंतप्रधान मोदींच्या हस्ते नागपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं भूमिपूजन

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज नागपूर येथील विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं ऑनलाइन पद्धतीनं भूमिपूजन केलं.

By ETV Bharat Marathi Team

Published : 4 hours ago

NAGPUR AIRPORT NEW TERMINAL
पंतप्रधान नरेंद्र मोदी (Source - ANI)

नागपूर :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज (9 ऑक्टोबर) नागपूर विमानतळाच्या नवीन टर्मिनलचं ऑनलाइन पद्धतीनं भूमिपूजन केलं. यावेळी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह नागपूर शहरातील भारतीय जनता पक्षाचे आजी-माजी आमदार आणि नेते उपस्थित होते. यावेळी बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. हरियाणा आणि जम्मू काश्मीरच्या निवडणुकीत काँग्रेसच्या अर्बन नक्षल टोळीनं फेक नेरेटिव्हचा प्रयोग केला. मात्र, हरियाणाच्या जनतेनं त्यांना त्यांची जागा दाखवून दिल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी म्हटलं.

सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती दिल्यामुळं नागपूरच्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या दुसऱ्या धावपट्टीचा मार्ग अडलेला होता. काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयानं स्थगिती रद्द केल्यानं नव्या धावपट्टीचा मार्ग मोकळा झाला. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते आज या नवीन विमानतळाचं भूमिपूजन करण्यात आलं. नवीन विमानतळाच्या उभारणीसाठी सुमारे 7 हजार कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहे. यात नवीन धावपट्टी, नवीन टर्मिनल इमारत, आधुनिक लाउंज आणि पार्किंगची सुविधा असेल. बांधकाम पूर्ण झाल्यानंतर या विमानतळावरून दरवर्षी दीड कोटी प्रवासी प्रवास करू शकतील.

महाराष्ट्राच्या सर्वांगिण विकासासाठी प्रयत्न :महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासासाठी गेल्या 10 वर्षांपासून सुरू केलेल्या प्रयत्नांमुळं अनेक पायाभूत सुविधांसह विकासाचे नवे समृद्ध मार्ग खुले झाले आहेत. महाराष्ट्रातील 10 वैद्यकीय महाविद्यालयांचे उद्घाटन होत आहे. विदर्भाच्या एकात्मिक विकासाला चालना देणाऱ्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विकास कामांची पायाभरणी होत आहे. शिर्डी विमानतळाच्या एकात्मिक टर्मिनल इमारतीची पायाभरणी, इंडियन इन्स्टीट्युट ऑफ स्किल्स मुंबई आणि विद्या समीक्षा केंद्राचा शुभारंभ होताना मला आनंद होत आहे. ही स्वस्थ आणि समृद्ध महाराष्ट्राची पायाभरणी असल्याचं प्रतिपादन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी केलं.

महाराष्ट्रात विकासकामांची पायाभरणी :पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते डॉ. बाबासाहेब आंबेडकर आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विविध विकास कामांचं आणि टर्मिनल इमारतीचं आज भूमिपूजन करण्यात आलं. राज्यभरात 10 नवीन शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांचा शुभारंभही करण्यात आला. तसंच 10 शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांना मान्यता देण्यात आली, त्यामुळं एमबीबीएस अभ्यासक्रमात 900 जागांची वाढ होणार. तर शिर्डी येथील आंतरराष्ट्रीय विमानतळाचं नवीन टर्मिनल इमारतीची पायाभरणी करण्यात आली.

काँग्रेस विकास विरोधी पक्ष :महाराष्ट्राचा ज्या वेगानं विकास होतोय, त्याही पेक्षा अधिक वेगानं काँग्रेसच्या काळात भ्रष्टाचार होत असल्याचा आरोप पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलाय. "काँग्रेस हा बेजबाबदार पक्ष असल्याचं अनेकवेळा सिद्ध झालं असून, खोटी विधानं करून ते जनतेची दिशाभूल करत करतात. काँग्रेस समाजातील लोकांना घाबरवून राजकारण करत आहे. एका जातीचं दुसऱ्या जातीसोबत भांडण लावायचं काम करत काँग्रेस राजकीय पोळी भाजण्याचा प्रयत्न करत आहे," असा घणाघात मोदींनी केला.

हरियाणातील विजय ऐतिहासिक : "हरियाणाच्या जनतेनं दाखवून दिलं आहे देश कोणाच्या बाजूनं आहे. हरियाणातील विजय ऐतिहासिक आहे. काँग्रेसनं हरियाणा आणि जम्मू काश्मीरमध्ये खोटं पसरवण्याचं काम केलं, पण दलित समाजानं त्यांचे इरादे ओळखले होते. हरियाणातील सर्व दलित आणि ओबीसी समाजानं भाजपाला साथ दिली. काँग्रेसनं शेतकऱ्यांना भडकवण्याचा खूप प्रयत्न केला. परंतु शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव कुणी दिला हे शेतकऱ्यांना माहिती असल्यानं ते आमच्या बाजूनं भक्कमपणे उभे राहिले," असं देखील नरेंद्र मोदी म्हणाले.

गडकरींनी अधिकाऱ्यांना दिला दम : नवीन विमानतळाच्या उभारणीत कोणतीही हयगय खपवून घेणार नाही. या प्रोजेक्टवर माझी बारीक नजर असणार. काम दर्जेदार केलं नाही, तर मी अधिकाऱ्यांसह कंत्राटदाराला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही," असा सज्जड दम केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दिला.

विदर्भ विकासासह राज्यातील आरोग्य सुविधेला गती : "नागपूरच्या विमानतळावर टर्मिनल साकारलं जात आहे. या नव्या टर्मिनलमुळं एका वेळी 100 विमानांची व्यवस्था केली जाणार. यामुळं विदर्भाच्या विकासाला गती मिळणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले. शिर्डीलाही आंतरराष्ट्रीय स्तरावर महत्व आहे. संपूर्ण जग शिर्डीकडे तीर्थक्षेत्र म्हणून पाहतं. याठीकाणी साडे सहाशे कोटी रूपये खर्चून टर्मिनल उभारलं जात आहे. यामुळं शिर्डीतील पर्यटनाला चालना मिळेल. त्यातून रोजगार आणि सेवा संधीही वाढतील," असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.

नागपूरसह शिर्डी विमानतळामुळं विकासाला चालना :नागपूर विमानतळावर दोन धावपट्टी असणं गरजेचं आहे. शिर्डीचं विमानतळ सर्वात व्यस्त विमानतळ म्हणून भविष्यात होणार आहे. अनेक सुविधा व कामांचं आज भूमिपूजन झालं. यामुळं शिर्डी किंवा साई भक्तांना नाही, तर संपूर्ण महाराष्ट्रातील लोकांना दिलासा मिळणार," असं उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.

हेही वाचा

  1. शरद पवारांचा भाजपाला पुन्हा 'दे धक्का'; संजय काकडे 'तुतारी' घेणार हाती
  2. "एअर इंडियानं अन्याय केला...", रामदास आठवले नागरी उड्डाण मंत्र्यांकडं करणार तक्रार, नेमकं प्रकरण काय?
  3. रमेश कदम, बाळा भेगडे, विवेक कोल्हे...; शरद पवारांचे जुने मावळे पुन्हा 'तुतारी' फुंकणार

ABOUT THE AUTHOR

...view details