महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / state

आरक्षणाच्या मागणीसाठी मंत्रालयातील जाळीवर आता आदिवासी नव्हे, तर धनगरांच्या उड्या; नेमकं काय घडलं?

मंत्रालयातील जाळ्यांवर आज पुन्हा एकदा धनगर समाजातील आंदोलकांनी जोरदार आंदोलन केलं. अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी धनगरांनी राज्यभरात आंदोलन सुरू आहे.

By ETV Bharat Marathi Team

Published : 5 hours ago

Dhangar ST Reservation
धनगरांचं आंदोलन (ETV Bharat File Photo)

मुंबई- धनगर समाजाला अनुसूचित जमातीमधून आरक्षण द्यावे या मागणीसाठी धनगर समाजातील आंदोलकांनी आज मंत्रालयातील जाळ्यांवरून उड्या मारल्यात. धनगर समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये यासाठी नुकतेच आदिवासी समाजातील आमदारांनी जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन केलं होतं. त्यामुळे मंत्रालयातील जाळ्या हे आता आंदोलनाचे नवं ठिकाण ठरत आहे. मंत्रालयातील जाळ्यांवर आज पुन्हा एकदा धनगर समाजातील आंदोलकांनी जोरदार आंदोलन केलं. अनुसूचित जमातीमध्ये धनगर समाजाचा समावेश करण्यात यावा, या मागणीसाठी धनगर समाजाचे राज्यभरात आंदोलन सुरू आहे. या संदर्भात सरकारने लवकरात लवकर अध्यादेश काढावा, अशी मागणी धनगर समाजाने केलीय, मात्र अध्यादेश न निघाल्यामुळे अखेरीस या समाजातील आंदोलकांनी मंगळवारी मंत्रालयातील जाळ्यांवर उड्या मारत आंदोलन केलं. दोनच दिवसांपूर्वी आदिवासी समाजातील आमदारांनी धनगर समाजाचा समावेश अनुसूचित जमातीमध्ये करू नये, यासाठी जाळ्यांवर उड्या मारून आंदोलन केलं होतं.

सरकारने दखल घ्यावी : धनगर समाजातील आंदोलकांनी आज केलेल्या आंदोलनाची सरकारने गंभीर दखल घ्यावी आणि लवकरात लवकर सुधाकर शिंदे सादर केलेल्या अहवाल स्वीकारून त्याची अंमलबजावणी करावी, अशी मागणी धनगर समाजाचे नेते गोपीचंद पडळकर यांनी केलीय. धनगर समाजातील आंदोलकांनी केलेल्या या आंदोलनानंतर त्यांच्यावर गुन्हे दाखल न करता त्यांना सोडून देण्यात यावे. तसेच तातडीने या संदर्भात राज्य सरकारने कार्यवाही करावी, अशी मागणी गोपीचंद पडळकर यांनी केलीय.

आदिवासी नेत्यांनी आरक्षण लाटलं :यावेळी बोलताना गोपीचंद पडळकर म्हणाले की, आदिवासी समाजातील नेत्यांनीच त्यांच्या समाजातील उपजातींचे आरक्षण लाटलंय. आदिवासी समाजामध्ये असलेल्या 117 जातींपैकी केवळ काही जातींना आरक्षण मिळालं आहे. उर्वरित आदिवासी समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये, यासाठी नेत्यांनी आणि सचिवांनी प्रयत्न केल्याचा आरोप यावेळी पडळकर यांनी केलाय. झिरवळ आणि तत्सम नेत्यांनी आरक्षण लाटण्याचा त्यांनी नाव घेऊन आरोप केला.

लवकरात लवकर लागू करा :यासंदर्भात बोलताना धनगर समाजाचे नेते प्रकाश शेंडगे म्हणाले की, आता धनगर समाजाची सहनशीलता संपलेली आहे हे या आंदोलनातून दिसते. राज्यभरात आंदोलन वेगवेगळ्या ठिकाणी सुरू आहे, मात्र या ठिकाणी जे आंदोलन करण्यात आले होते, ते मराठवाड्यातील होते. सरकारने सुधाकर समितीचा अहवाल स्वीकारण्यासाठी संघर्ष करायला लावला, मात्र आता जर अहवाल स्वीकारून अध्यादेश काढला नाही, तर अधिक तीव्र संघर्ष करावा लागेल, असा इशारा यावेळी प्रकाश शेंडगे यांनी दिला. दरम्यान, पोलिसांनी आंदोलकांना ताब्यात घेऊन मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात नेले.

ABOUT THE AUTHOR

...view details