मुंबई - भाजप खासदार नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यावर विखारी टीका केली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी दसरा मेळाव्यात केलेलं भाषण म्हणजे निर्बुद्ध बरळणं होतं. तसेच ताळमेळ नसलेले होतं, असे ते म्हणाले. तसेच पंतप्रधानाबद्दल बोलण्याची त्यांची लायकी नाही. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे मुख्यमंत्री पदाच्या लायकीचे नाहीत, असेही ते म्हणाले.
कालचा दसरा मेळावा हा पोलिसांचा वापर करून आपल्या मुलाला वाचवण्यासाठी जसे प्रयत्न केले तसाच होता. राज्यामध्ये केलेली कामाबद्दल ते बोलले नाहीत. कोरोनामुळे सर्वांत जास्त मृत्यू महाराष्ट्रात झाले. त्यावर बोलण्याची त्यांची जबाबदारी होती. त्यांना जणाची नाही. तर मनाची तरी लाज वाटायला हवी होती, असे नारायण राणे म्हणाले.
मुख्यमंत्री पदाला ते लायक नाहीत. 56 आमदारांवर बेईमानी करून मुख्यमंत्री पद मिळवलं आहे. ते घरात बसून मुख्यमंत्री पद चालवतता. आता दोन दिवसांपूर्वी पिजऱ्यातून बाहेर पडत त्यांनी दौरा केला. स्वतःला वाघ म्हणवणाऱ्या उद्धव ठाकरेंनी कुणाला कानाखाली तरी दिली आहे का?, असा सवाल राणे यांनी केला.
बाळासाहेब माझ्यासमोर रडले -
मला बाळासाहेब ठाकरे यांनी मुख्यमंत्री केला वाघ म्हणून बेडूक म्हणून नाही. उद्धव ठाकरे यांनी बाळासाहेब ठाकरे यांना छळलं आहे. 2005 साली शिवसेनाचा दसरा मेळावा हा सेना भवनासमोर करायचा होता. पण त्यांनी स्वतः तिथे न घेण्याचा निर्णय घेऊन, सामनामध्ये जाहीर केलं. तेव्हा बाळासाहेब माझ्यासमोर रडले, असे नारायण राणे म्हणाले.
आम्ही बोललो तर पळता भूई थोडी होईल -
तुमच्यासाठी माझे निलेश आणि नितेश हे दोघेच पुरे आहेत. गेल्या 39 वर्षातं जे सेनेत बघितलं, ते सर्व सांगणे. केसेस आम्ही अंगावर घेतल्या, तुम्ही काय केले. आम्ही बोललो तर पळता भुई थोडी होईल कपडे हातात घेऊन पळावे लागेल, असे राणे म्हणाले.