मुंबई - मोबाईल हा मानवाच्या दैनंदिन आयुष्यातील महत्त्वाचा भाग आहे. लॉकडाऊनच्या काळात कोणत्याही प्रकारची अत्यावश्यक सेवा घरी बसून मागवायची असेल तर मोबाईलशिवाय पर्याय नाही. मात्र, मोबाईल बिघडला किंवा रिचार्ज करायचा असेल तर काय करायचे? हा प्रश्न नागरिकांनी उपस्थित केला आहे. काही ठिकाणी इलेक्ट्रॉनिक्स दुकानांना परवानगी दिली आहे. मात्र, मोबाईल दुकानांना अद्याप ही परवानगी नाही. त्यामुळे मोबाईल दुकाने आणि सर्व्हिस सेंटर बंद आहेत. याचा आढावा घेणारा ईटीव्ही भारतचा हा विशेष रिपोर्ट..
मोबाईल विक्री व दुरूस्तीची दुकाने सुरू करण्याची मागणी लॉकडाऊन काळात तर मोबाईलचे महत्त्व मोठ्या प्रमाणात वाढले आहे. या दोन महिन्यांच्या काळात अनेकांचे मोबाईल बंद झाले. मात्र, सर्व्हिस सेंटर अद्याप बंदच आहेत. त्यामुळे अनेक नागरिकांची गैरसोय झाली आहे. स्थानिक मोबाईल दुकाने आणि सर्व्हिस सेंटर उघडावेत, अशी मागणी नागरिकांमधून होत आहे. भारतात मोबाईलचा मोठा व्यापार आहे. मोबाईलशी निगडित अनेक उद्योगधंदे देखील बंद आहेत. यामुळे अनेकांचा रोजगारही बुडत आहे. मोबाईल दुरूस्ती आणि विक्रीसाठी दुकान उडघण्यास परवानगी द्यावे, अशी मागणी दुकानदार देखील करत आहेत.
या लॉकडाऊन काळामध्ये मोबाईल आपला सहारा बनला आहे. डिजीटलच्या जमान्यात अनेक कामांसाठी मोबाईलवर अलंबलून रहावे लागते. लॉकडाऊनमध्ये माझा मोबाईल खराब झाला होता. मी अनेक ठिकाणी संपर्क केला मात्र, सगळीकडे दुकाने आणि सेवा बंद होती. शेवटी पनवेलला एका ठिकाणी मदत मिळाली मात्र, त्यासाठी कामोठे ते पनवेल चालत जावे लागले. जर जवळ दुकान सुरू असते तर मला एवढी पायपीट करावी लागली नसती, असे उदय गायकवाड यांनी सांगितले.
दोन महिन्यांपासून दुकान बंद आहेत. यामुळे मला अनेक ग्राहकांचे फोन येत आहेत. आमचा रिचार्ज संपला, मोबाईल खराब झाला, अशा अनेक तक्रारी आहेत परंतु लॉकडाऊनमुळे आम्ही त्यांची मदत करू शकत नाही. अत्यावश्यक सेवा वापरण्यासाठी लागणारा मोबाईल खराब झाला तर नागरिकांनी करायचे काय? यामुळे दुकाने उघडली पाहिजेत. योग्य नियमांचे पालन करूनच आम्ही सेवा देणार आहोत. मोबाईल व्यवसायातूनही सरकारला मोठा महसूल मिळतो. अनेक कुटुंब या मोबाईल उद्योगांशी जोडलेले आहेत, असे जागृती मोबाईल शॉपचे मालक गणेश बासा यांनी सांगितले.
माझा मोबाईल दुरूस्तीचा छोटा व्यवसाय आहे. मोबाईल बिघडल्याचे अनेक फोन मला आले आहेत. मात्र, लॉकडाऊनमुळे मी कुणाचीही मदत करू शकलो नाही. यामुळे आता तरी दुकाने सुरू करण्यासाठी परवानगी द्यावी असे मनोज बुटीया यांनी सांगितले.