जळगाव - भडगाव तालुक्यातील वढदे गावातील शेतकऱ्यांनी त्यांचे केळीचे पीक नष्ट केले. केळीला भाव मिळाला नाही, शिवाय लागवडीचाही खर्च न निघाल्याने हताश होऊन त्यांनी हे पाऊल उचलले. जुबलसिंग पाटील आणि संजय पाटील अशी शेतकऱ्यांची नावे आहेत.
हेही वाचा -Union Budget 2022 Expectations : दागिन्यांत संबंधीत स्टॅम्प ड्यूटीसह कर कमी व्हावे; जळगावातील सराफ व्यायवसायिकांच्या अपेक्षा
व्याजाचे पैसे घेऊन शेतकर्यांनी आपल्या शेतात टिश्यूकल्चर केळी लावली. तिला वाढवली, फुलवली. मात्र, नेहमीप्रमाणे शेतकर्यांच्या नशिबी आले ते दुखच. लागवडीवर लाखो रुपयांचा खर्च केला. मजुरीचाच काय पण, लागवडीचाही खर्च निघाला नाही. मोठ्या नुकसानीमुळे हताश झालेल्या शेतकऱ्यांनी आपल्या शेतातली केळीवर जेसीबी फिरवून दुसर्या पीक लागवडीसाठी शेत तयार केले. १ हजार ५०० रुपये तास याप्रमाणे जेसीबी लावून सर्व शेतातील केळी उपटून फेकली.
हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही
आठ ते दहा जणांच्या परिवाराचा उदरनिर्वाह शेतीवर चालतो. अल्पभूधारक शेतकरी असून दोन एकरात केळीची लागवड केली. दीड लाखांपर्यंत खर्च केला, मात्र हातात एक रुपयासुद्धा आला नाही. सरकारच आमचा मायबाप आहे. मात्र, हे सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी नाही, अशी प्रतिक्रिया शेतकरी जुबलसिंग पाटील यांनी दिली.
चार एकर शेतात दोन ते अडीच लाख रुपयांचा खर्च करून केळी लावली. मात्र, मजुरांच्या निंदणीचा सुद्धा खर्च मिळाला नाही. सहा लाख रुपये हातात येतील, अशी अपेक्षा होती. मात्र, दमडीही आली नाही. अखेर नैराश्यातून सर्व केळीवर जेसीबी फिरवले, अशी प्रतिक्रिया संजय पाटील यांनी दिली.
शासनाला शेतकऱ्यांचे हे आर्थिक संकट कदाचित दिसणार नाही, मात्र या शेतकऱ्यांच्या डोळ्यातील अश्रू नक्कीच दिसतील, अशी अपेक्षा आहे. आस्मानी व सुलतानी संकटाबरोबरच भाव मिळत नसल्याने शेतकरी चहूबाजूंनी संकटात सापडला आहे. नुकसानीच्या झळा सोसणार्या शेतकऱ्याच्या पाठिशी सरकार उभे राहील का? हाच खरा प्रश्न आहे.
असा होता अपेक्षित भाव
शेतकऱ्यांच्या केळी पिकांच्या सुपर मालाचे भाव 300 ते 400 सह 800 पर्यंत चालू आहे. तर 1 हजार 200 च्या पुढे भाव असले तर शेतकऱ्यांला परवडते. मात्र, तसा भावच मिळत नसल्याने उभ्या झाडावरून जेसीबी चालवून पिक काढून घेतले.
हेही वाचा -Balshakti Award 2022 : जळगावच्या चिमुरडीला पंतप्रधानांच्या हस्ते बालशक्ती पुरस्कार