ठाणे : भिवंडी शहरात पावसाळ्यात अतिधोकादायक इमारती कोसळून अपघाताच्या घटना नित्याच्याच आहेत. त्यातच काही दिवसांपूर्वी निर्मनुष्य दुमजली इमारत कोसळल्याची घटना घडली होती. सुदैवानं सदर दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नव्हती. मात्र, भिवंडीतील नारपोली गावातील चाळीत घराचं छप्पर तसंच भिंत कोसळल्यानं झालेल्या दुर्घटनेत तरुणाचा दबून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. विमल विशेसर शहा (35) असं दुर्घटनेत मयत पावलेल्या तरुणाचं नाव आहे. तर या दुर्घटने प्रकरणी नारपोली पोलीस ठाण्यात आकस्मिक मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.
तरुण ढिगाऱ्याखाली दबला : पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शुक्रवारी सकाळच्या सुमारास पावसामुळं नारपोली परिसरातील राजाराम पाटील चाळीतील एका खोलीची भिंत तसंच छप्पर अचानकणे खचून कोसळलं. त्याचा संपूर्ण राडारोडा खोलीत असलेल्या विमलवर पडून तो त्याखाली गाडला गेला. त्यानंतर या घटनेची माहिती स्थानिक नारपोली पोलिसांना देण्यात आली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत स्थानिकांच्या मदतीनं विमला बेशुद्ध अवस्थेत बाहेर काढलं. त्यानंतर त्याला येथील शासकीय रुग्णालयात दाखल केलं. मात्र, डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केलं.