जळगाव : परधाडे इथं बोगीत आग लागल्याची अफवा पसरल्यानं प्रवाशांनी उड्या मारल्यानं समोरुन येणाऱ्या पुष्पक एक्सप्रेसनं प्रवाशांना चिरडल्याची दुर्दैवी घटना घडली. या रेल्वे अपघातात बुधवारी तब्बल 12 प्रवाशांचा मृत्यू झाल्याचं रेल्वे प्रशासनानं जाहीर केलं. आज सकाळी या आपघातात आणखी एका प्रवाशाचा मृत्यू झाल्याचं उघडं झालं आहे. त्यामुळे जळगाव रेल्वे अपघातात आतापर्यंत मृतांचा आकडा 13 इतका झाला आहे. दरम्यान या आपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं पुढं आली आहेत. या मृतांमध्ये नेपाळमधील प्रवाशांचा समावेश असल्याचं उघड झालं आहे.
रेल्वे अपघातात नेपाळमधील प्रवाशांचा मृत्यू : जळगाव इथं झालेल्या रेल्वे अपघातात आतापर्यंत 13 प्रवाशांचा मृत्यू झाला. या आपघातात मृत्यू झालेल्या प्रवाशांची नावं उघड झाली आहेत. यात नेपाळ इथल्या कमला नवीन भंडारी ( वय 43 वर्षे, नेपाळ, हल्ली मुक्काम कुलाबा ) लच्छीराम खमू पासी ( वय 40 वर्षे, नेपाळ ) इम्तियाज अली ( वय 35 वर्षे, उत्तरप्रदेश ) नसरुद्दीन बद्रुद्दीन सिद्दीकी (वय 19 वर्षे, उत्तरप्रदेश ) जवकला भटे जयकडी ( वय 80 वर्षे, नेपाळ ) हिनू नंदराम विश्वकर्मा (वय 10 वर्षे, नेपाळ ) बाबू खान ( वय 27 वर्षे, उत्तरप्रदेश )
रेल्वे अपघाताची घटना दुर्दैवी - मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस : जळगावजवळ रेल्वे अपघाताची दुर्दैवी घटना घडली आहे. रेल्वेमध्ये आग लागल्याची अफवा पसरल्यानंतर काही प्रवाशांनी बाहेर उड्या मारल्या. त्यामुळे समोरुन येणाऱ्या रेल्वेनं त्यांना चिरडल्यानं अनेक प्रवाशांचा मृत्यू झाला आहे. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळी पोहोचले असून त्यांनी घटनेचा आढावा घेतला आहे. सरकारच्या वतीनं, आम्ही मृतांच्या नातेवाईकांना 5 लाखांची मदत जाहीर करत आहोत. जखमींवर सरकारी रुग्णालयात उपचार केले जातील. मी जिल्हा प्रशासनाच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बोललो असून पोलीस प्रशासनाच्या अधिकाऱ्यांकडूनही आढावा घेतला आहे. मंत्री गिरीश महाजन घटनास्थळावर असून सर्व मदतीबाबत सगळं काम पाहत आहेत, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं.
हेही वाचा :