नागपूर- दत्तात्रेय होसाबळे हे आता पुढील तीन वर्षांसाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे (RSS) सरकार्यवाह म्हणून काम करणार आहेत. दत्तात्रेय होसाबळे यांची पुढील तीन वर्षांसाठी सरकार्यवाह पदी एकमतानं निवड करण्यात आली आहे.
१५ मार्चपासून राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची तीन दिवसीय अखिल भारतीय प्रतिनिधी सभा ही नागपूरच्या रेशीमबाग येथील स्मृती भवन येथे घेण्यात आली. या बैठकीला राष्ट्रीय स्वयंसेवक संघाशी संबंधित एकूण ३६ विविध संघटनांचे प्रतिनिधी उपस्थित राहिले आहेत.
इलेक्टोरोल बाँडबाबत विचारले असता दत्तात्रेय होसाबळे म्हणाले, "इलेक्टोरोलची योजना एका दिवसात आणलेली नाही. जेव्हा बदल केले जातात, तेव्हा प्रश्न उपस्थित केले जातात. ईटीव्हीएम मशिनबाबत असेच प्रश्न उपस्थित करण्यात आले होते. नवीन काही असेल तर त्याबाबत लोकांनी प्रश्न उपस्थित करणं, हे नैसर्गिक आहे. मात्र, ते किती परिणामकारक आणि फायदेशीर आहे, हे काळच दाखवून देईल. त्यासाठी ते प्रयोगासाठी सोडून द्यायला पाहिजे," असं राष्ट्रीय स्वंयसेवक संघाला वाटतं. इलेक्टोरोल बाँडकडं प्रयोग म्हणून पाहावं, असे संकेत राष्ट्रीय स्वयंसेवक संघानं दिले आहेत.
देशात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी- पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या १० वर्षांच्या कारकीर्दीबाबत विचारले असता ते म्हणाले, "राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून समान नागरी कायद्याचं स्वागत करण्यात आलं आहे. समान नागरी कायदा लागू करावा, याबाबतचा ठराव आजवर अनेकवेळा वर्षे अखिल भारतीय प्रतिनिधी सभेत मंजूर करण्यात आला. समान नागरी कायद्याची उत्तराखंडमध्ये अंमलबजावणी करण्यात आली आहे. संपूर्ण देशात समान नागरी कायद्याची अंमलबजावणी करावी, असं आम्हाला वाटतं. मात्र, दत्तक, विवाह अशा काही मुद्द्यांबाबत चर्चा करण्याची गरज आहे. त्यानंतर आपण समान नागरी कायद्याबाबत पुढे जाऊ शकणार आहोत."
लोक ४ जूनला आपला कौल देणार- पुढे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरकार्यवाह म्हणाले, " गेल्या १० वर्षात लोकांनी देशातील प्रगती पाहिली आहे. सध्याचे शतक हे भारताचं शतक आहे असे अनेक आंतरराष्ट्रीय तज्ज्ञ आणि राजकीय जाणकारांनी वारंवार सांगितलं. काहीतरी चांगलं घडत असल्यानेच ते तसं म्हणत असतील. काही असलं तरी लोक ४ जूनला आपला कौल देणार आहेत. मथुरा आणि वाराणशी येथे काही ठिकाणी पूजा करण्यावरून वाद सुरू आहेत. त्याबाबत विचारले असता होसाबळे म्हणाले, हिंदू संत आणि विश्व हिंदू परिषद त्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. प्रत्येक गोष्टीसाठी रामजन्मभूमीप्रमाणं आंदोलन करावं लागू नये. ते गरजेचं नाही. त्याबाबतचा मुद्दा हा न्यायालयात आहे. जर न्यायालयात प्रश्न सुटला तर आंदोलन करण्याची आवश्यकता भासणार नाही."
अल्पसंख्याकांच्या व्याख्येबाबत पुनर्विचार करण्याची गरज-काशी आणि मथुरेबाबत जे काही असेल ते हिंदू समाजाकडून सामाजिक आणि धार्मिक नेतृत्वाच्या मार्गदर्शनाखाली करण्यात येईल, असे होसाबळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना सांगितलं. अल्पसंख्याकांच्या व्याख्येबाबत पुनर्विचार करण्याची गरज आहे. हा देश सगळ्यांचा आहे. देशात मुस्लिम आणि ख्रिश्चन हे अल्पसंख्याक आहेत. राजकारणातील अल्पसंख्याकवादाला राष्ट्रीय स्वंयसेवक संघाचा नेहमीच विरोध राहिला आहे, असं होसाबळे यांनी म्हटलं.
दत्तात्रेय होसाबळे यांचा जीवन परिचय- दत्तात्रेय होसाबळे यांचा जन्म १९५४ मध्ये कर्नाटकातील शिमोगा जिल्ह्यातील होसाबळे या गावात झाला. त्यांनी बंगळुरू विद्यापीठातून इंग्रजीमध्ये पदव्युत्तर शिक्षण पूर्ण केले. दत्तात्रेय होसाबळे १९६८ मध्ये वयाच्या १३ व्या वर्षी संघाचे स्वयंसेवक झाले. १९७२ मध्ये ते अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेमध्ये सामील झाले. १९७८ मध्ये त्यांनी पदव्युत्तर पदवी पूर्ण केल्यानंतर ते संघाचे प्रचारक बनले. विद्यार्थी परिषदेत प्रांतीय, प्रादेशिक व अखिल भारतीय स्तरावर विविध जबाबदाऱ्या पार पाडल्यानंतर १९९२ ते २००३ अशी ११ वर्षे ते अखिल भारतीय संघटनेचे मंत्री होते. २०१३ मध्ये ते राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे अखिल भारतीय सह-बौद्धिक प्रमुख झाले. २००९ ते २०२१ या कालावधीत सह-कार्यवाह पदावर कार्यरत होते. २०२१ पासून ते संघाच्या सरकार्यवाह पदाची जबाबदारी सांभाळत आहेत.
अनेक भाषांचे आहे ज्ञान - दत्तात्रेय होसाबळे यांची मातृभाषा कन्नड जरी असली तरी त्यांना इंग्रजी, तामिळ, मराठी, हिंदी आणि संस्कृतसह अनेक भाषांचे ज्ञान आहे. ते असिमा कन्नड मासिकाचे संस्थापक संपादकही होते. १९७५-७८च्या आणीबाणीच्या काळात त्यांनी चळवळीत सक्रिय भूमिका बजावली. ते सुमारे १४ महिने 'मिसा' अंतर्गत तुरुंगात राहिले. ते विश्व विद्यार्थी युवा संघटनेचे (WOSY) संस्थापक सरचिटणीसदेखील होते. ही भारतात शिकणाऱ्या परदेशी विद्यार्थ्यांची संघटना आहे. सरकार्यवाह होसाबळे यांनी यापूर्वी अमेरिका आणि युरोपसह जगातील अनेक देशांना भेट दिली आहे.
- आरएससनं एक्सवरील पोस्टमध्ये म्हटले की, " २०२४ ते २०२७ या कालावधीसाठी त्यांची या पदावर पुन्हा निवड करण्यात आली आहे, असे त्यात म्हटले आहे. राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे मुख्यालय असलेल्या नागपुरात सहा वर्षांनंतर ही बैठक होत आहे. आरएसएसशी संलग्न विविध संघटनांचे १,५०० हून अधिक प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित आहेत.
हेही वाचा-