मुंबई Sanjay Dina Patil VS Mihir Kotecha : राज्यात लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय वातावरण तापलेलं असताना आणखी एक मोठी राजकीय घटना घडली आहे. शुक्रवारी (17 मे) मुलुंडमध्ये ठाकरे गट आणि भाजपाचे कार्यकर्ते आमने-सामने आल्याचं पाहायला मिळालं. यावेळी भाजपाचे उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या मुलुंड येथील कार्यालयाची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आली. तर कोटेचा यांच्या कार्यालयातून पैसे वाटप होत असल्याचा दावा ठाकरे गटाकडून करण्यात आलाय. विशेष म्हणजे या घटनेनंतर लगेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी कोटेचा यांच्या कार्यालयाकडं धाव घेत, तेथील परिस्थितीचा आढावा घेतला.
काय म्हणाले अंबादास दानवे ? : भाजपा उमेदवार मिहीर कोटेचा यांच्या खासगी कार्यलयातून मतदारांना पैसे वाटप होत असल्याचा आरोप ठाकरे गटाकडून करण्यात आला. त्यानंतर गृहमंत्र्यांनी त्या ठिकाणी जाऊन भेट दिली. या घटनेनंतर विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी मुलुंड पोलीस ठाण्यात धाव घेतली. तसंच घडलेल्या प्रकारची माहिती परिमंडळ 7 चे पोलीस उपायुक्त यांच्याकडून जाणून घेतली. त्यानंतर प्रसार माध्यमांशी संवाद साधत असताना या प्रकरणात पोलीस आणि निवडणूक आयोग पक्षपातीपणे वागत असल्याचं दानवे म्हणाले. तसंच पैसे वाटप करणाऱ्यांना संरक्षण देण्यासाठी गृहमंत्री आले होते, असा आरोप देखील त्यांनी यावेळी केला.
मिळालेल्या माहितीनुसार, भाजपाचे काही कार्यकर्ते पैसे वाटत असल्याचा आरोप करत स्थानिक शिवसैनिकांनी (ठाकरे गट) त्यांना पोलिसांच्या ताब्यात दिलं. हा सर्व प्रकार मिहीर कोटेचा यांच्या कार्यालयाजवळच झाला. यावेळी त्या ठिकाणी जमलेल्या भाजपाच्या कार्यकर्त्यांनी अरेरावी करुन मारहाण करायला सुरुवात केल्याचा आरोप उबाठा गटानं केला. शिवाय रस्त्याच्या मधोमध येऊन वाहतुकीला अडथळा निर्माण केला. यावर पोलिसांनी कारवाई करीत भाजपाच्या कार्यकर्त्यांना दुसऱ्या ठिकाणी नेले. तर शिवसेनेच्या 10 ते 15 कार्यकर्त्यांना ताब्यात घेऊन पोलीस ठाण्यात आणलं.
कुठल्याही प्रकारचं कार्यालय तोडलेलं नाही : एकीकडं कोटेचा यांच्या कार्यालयाची ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांकडून तोडफोड करण्यात आल्याचं बोललं जात असताना दुसरीकडं मात्र कुठल्याही प्रकारचं कार्यालय तोडलेलं नाही, असं ठाकरे गटाकडून स्पष्ट केलं जातंय. तसंच काही वृत्तवाहिन्या जाणीवपूर्वक मिहीर कोटेचा यांचं कार्यालय तोडलं, अशा बातम्या चालवत आहेत. संजय दिना पाटील यांच्या कार्यकर्त्यांचा गुंड असा उल्लेख केल्या जातोय. मात्र, या ठिकाणी असा कुठलाही प्रकार झाला नसून कुठल्याही प्रकारचं कार्यालय तोडलेलं नाही. थोड्यावेळापूर्वीच देवेंद्र फडणवीस यांनी या भागाला भेट दिली. पैसे वाटताना भाजपाचे कार्यकर्ते सापडल्यानं हे प्रकरण दाबण्यासाठी देवेंद्र फडणवीस या ठिकाणी आले, असा आरोप ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केलाय.
हेही वाचा -
- "ठाकरे गट आणि संजय दिना पाटील यांना मराठी-गुजराती वाद...", नेमकं काय म्हणाले मिहीर कोटेचा? वाचा सविस्तर - Mihir Kotecha Exclusive Interview
- मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात कोण मारणार बाजी? काय आहे मतदारसंघाचा इतिहास? - Mumbai North East Lok Sabha
- मुंबईत धार्मिक कार्यक्रमात भाजपाच्या उमेदवाराला मतदान करण्याचं आवाहन भोवलं; आयोजकाविरुद्ध गुन्हा दाखल - lok sabha election 2024