मुंबई Sanjay Raut : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीनं मुंबईतील सहापैकी 4 जागा जिंकत महायुतीला धोबीपछाड दिलं आहे. मात्र उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघातील निकालावरून पुन्हा एकदा संजय राऊत यांनी भाजपावर निशाणा साधला आहे. मुंबईतील लोकसभेच्या एका जागेवर भाजपा-शिंदे यांनी दरोडा टाकल्याचा आरोप ठाकरेंचे खासदार संजय राऊत यांनी केला आहे.
आमच्या एका जागेवर दरोडा टाकला : विधानसभा निवडणुकीच्या जागावाटपावर अजून पर्यंत चर्चा झालेली नाही. त्यामुळं आम्ही एकत्र बसून कोण किती जागा लढवणार, हे ठरवणार आहे. हे महत्त्वाचं आहे की, यावेळी शरद पवार यांचा स्ट्राईकरेट सर्वात जास्त आहे. शरद पवार यांनी 10 जागा लढवल्या आणि 8 जागा जिंकल्या. आम्ही 21 जागा लढवल्या आणि 9 जागा जिंकल्या मात्र सर्वात जास्त टार्गेट आमच्या शिवसेनेला केलं गेलं. मुंबईतील एका जागेवर दरोडा टाकला आहे. भाजपा आणि एकनाथ शिंदे यांच्याकडून ती जागा देखील आम्ही जिंकलो असतो. दोन-तीन जागा अशा आहेत की, आम्ही कमी फरकानं तिथं हरलो आहोत. आमचा देखील स्ट्राईक रेट चांगला आहे. काँग्रेसचा देखील चांगला आहे. 288 जागा महाराष्ट्रात आहेत. त्यामुळं कोणाला जागा कमी पडणार नाहीत आणि सगळे आरामात लढतील, असा विश्वास संजय राऊत यांनी व्यक्त केला आहे.
सर्वपक्षीय चर्चा व्हायला हवी : आरक्षणाच्या संदर्भात बोलताना संजय राऊत म्हणाले, ''याबाबत राजकीय विधान करणार नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून मराठा आणि ओबीसी समाज एकमेकांविरोधात उभा आहे. हे राज्याच्या सुरक्षितता आणि शांततेकरता योग्य नाही. बिहारमध्ये 50 टक्क्याच्या वर जे वाढीव आरक्षण होतं, ते न्यायालयानं मान्य केलं नाही. आरक्षणाच्या मुद्द्यावरून महाराष्ट्रात संघर्ष सुरू आहे. मराठा, ओबीसी आणि धनगर समाजात आरक्षणावरून संघर्षाची परिस्थिती दिसून येत आहे. हे सरकार काय करत आहे? असा सवाल संजय राऊत यांनी उपस्थित केला. सर्व राजकीय पक्षांना, नेत्यांना सामावून घेऊन हा जो राज्यामध्ये संघर्ष सुरू आहे तो थांबवण्याच्या दृष्टीनं सरकारनं चर्चा केली पाहिजे. शिष्टमंडळ उपोषणकर्त्यांकडे जाऊन हा प्रश्न सुटणार नाही. कारण कोणत्याही समाजाचा नेता, उपोषणकर्ता सरकारवर विश्वास ठेवत नसतो. जरांगे पाटील आणि लक्ष्मण हाके यांनी देखील सांगितलय सरकारवर माझा विश्वास नाही. अशा परिस्थितीत सरकारवर उपोषणकर्त्यांचा विश्वास बसत नसेल तर यावर उपाय म्हणून सर्व पक्ष नेत्यांना किंवा समिती सोबत घेऊन सर्वपक्षीय चर्चा करून तोडगा काढला पाहिजे.''