हैदराबाद : केंद्र सरकारद्वारे नागरिकांसाठी जनेरिक औषधांची सुविधा पुरवण्यात आली आहे. ही औषधे ब्रँडेड औषधांपेक्षाही कितीतरी पटीने स्वस्त असल्याने गरीब नागरिकांना ती सहज परवडण्यासारखी आहेत. मात्र तरीही जेनेरिक औषधांबाबत नागरिकांना अद्याप पुरशी माहिती उपलब्ध नाही. त्यामुळे नागरिकांमध्ये जेनेरिक औषधांबाबतची जनजागृती करण्यासाठी मार्चच्या पहिल्या सप्ताहात जनऔषधी सप्ताह साजरा केला जातो. तर देशात जेनेरिक औषधांचा प्रसार वाढवून जागरूकता करण्यासाठी 7 मार्चला जनऔषधी दिन साजरा करण्यात येतो.
नागरिकांमध्ये जनजागृती करणे आवश्यक : आजारामुळे सगळ्याच वर्गातील नागरिकांना त्रास होतो. परंतु आजार बरे करण्यासाठी औषधे घेणे कधीकधी दारिद्र्य रेषेखालील नागरिकांसाठी चिंतेचे कारण बनते. काही औषधे खूप महाग असल्याने नागरिकांना औषध घेणे शक्य होत नाही. त्यासाठी भारत सरकारने जेनेरिक औषधांचा प्रसार करण्यासाठी प्रयत्न करत आहे. त्यामुळे औषधांची किंमत कोणत्याही व्यक्तीच्या उपचारात अडथळा ठरू नये असा प्रयत्न सरकारचा आहे. आजारात प्रत्येक व्यक्तीला औषधे उपलब्ध व्हावी असा सरकारचा प्रयत्न आहे. त्यासाठी अनेक जनऔषधी केंद्रेही चालवली जात आहेत. मात्र तरीही नागरिकांना जेनेरिक औषधांबाबत फारशी माहिती नसल्याने चिंता व्यक्त करण्यात येत आहे.
काय आहे जेनेरिक औषधी : जेनेरिक औषधी ही प्रत्यक्षात ब्रँड नाव नसलेली औषधी आहे. या औषधांची किंमत तुलनेने खूपच कमी आहे. परंतु ती लोकप्रिय ब्रँडच्या महागड्या औषधांइतकी सुरक्षित, प्रभावी आणि फायदेशीर असल्याचा दावा करण्यात येतो. त्यामुळे नागरिकांना जेनेरिक औषधी फायदेशीर ठरत आहे.
काय आहे जेनेरिक औषधी दिवसाचा इतिहास : पंतप्रधान भारतीय जन औषधी योजना (PMBJP) ही योजना गरजू नागरिकांना परवडणाऱ्या किमतीत दर्जेदार औषधी उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने भारत सरकारने सुरू केली आहे. ही योजना रसायन आणि खते मंत्रालयाच्या फार्मास्युटिकल्स विभागाकडून नोव्हेंबर 2008 मध्ये सुरू करण्यात आली. या अंतर्गत देशातील अनेक भागात जनऔषधी केंद्रे सुरू करण्यात आली. परंतु पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हा दिवस जनऔषधी दिवस म्हणून साजरा करण्याची घोषणा केल्यानंतर 7 मार्च 2019 ला हा दिवस प्रथमच साजरा करण्यात आला.
दररोज १२ लाख नागरिक घेतात औषधी : सध्या देशातील 9 हजार पेक्षा अधिक जनऔषधी केंद्रांवर 50 ते 90 टक्के स्वस्त औषधी उपलब्ध आहेत. ही औषधे महागड्या औषधांइतकीच प्रभावी आहेत. या जनऔषधी केंद्रांवरुन दररोज १२ लाख नागरिक औषधी खरेदी करतात. 31 जानेवारी 2023 पर्यंत देशातील 764 जिल्ह्यांपैकी 743 जिल्ह्यांमध्ये 9082 जनऔषधी केंद्रांची स्थापना करण्यात आली आहे. या केंद्रात 1 हजार 759 औषधे आणि 280 शस्त्रक्रिया साधने माफक दरात उपलब्ध करून दिली जात आहेत. त्यासह विविध औषधे आणि वैद्यकीय उपकरणे या केंद्रांवर उपलब्ध आहेत. भारत सरकारने 2023 च्या डिसेंबर महिन्यापर्यंत 10 हजार जन औषधी केंद्र सुरू करण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
हेही वाचा - World Obesity Day 2023 : जगासमोरचे सगळ्यात मोठे आरोग्य संकट बनले लठ्ठपणा; कशी घ्यावी काळजी