यवतमाळ - 'पूजा चव्हाण आत्महत्या प्रकरणामध्ये सीबीआय चौकशी करण्यात यावी,' या मागणीसाठी भाजप महिला आघाडीच्या वतीने बसस्थानक चौकात रास्ता रोको करण्याचा इशारा दिला होता. हे आंदोलन सुरू होण्यापूर्वीच पोलिसांनी दडपले असून सात महिलांना पोलीस मुख्यालयात स्थानबद्ध करण्यात आले. या वेळी, 'पूजा चव्हाणला न्याय मिळेपर्यंत भाजप आक्रमक राहणार असून यापुढे तीव्र आंदोलन करू' असा इशारा भाजप महिला आघाडी जिल्हाध्यक्ष माया शेरे यांनी दिला.
![BJP agitation news against Yavatmal Minister Sanjay Rathore्](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-ytl-04-bjp-mhila-andolan-vis-byte-mh10049_27022021130701_2702f_1614411421_759.jpg)
'जिल्ह्यात सध्या कोरोनाचा प्रादुर्भाव वाढत चालला आहे. अशा स्थितीत आम्ही केवळ पाच महिला बसस्थानक चौकात आंदोलन करणार होतो. शासनाने जे नियम दिले होते त्याला अनुसरून हे आमचे आंदोलन होणार होते. मात्र, शासनाकडून आंदोलनकर्ते कमी आणि पोलिसांचा फौजफाटा मोठ्या प्रमाणात लावण्यात आला,' असा हल्ला भाजपकडून चढवण्यात आला आहे.
न्यायासाठी महिलांना रस्त्यावर उतरावे लागते
पूजा चव्हाण तिने आत्महत्या केली की तिची हत्या झाली हे अद्यापही महाविकासआघाडी सिद्ध करू शकली नाही. तिला न्याय मिळावा, यासाठी महिलांना रस्त्यावर उतरावे लागते हे शोकांतिका आहे. सत्तेवर येतेवेळी महाविकासआघाडीतील तिन्ही पक्षांनी शिवरायांचे राज्य आहे असे सांगितले. मात्र, आता महिलांवर अत्याचार होत असताना कुठे गेले हे राज्य, असा प्रश्नही या वेळी उपस्थित करण्यात आला.