वाशिम - एका प्रेमीयुगुलाच्या हट्टापायी कुटुंबीयांच्या उपस्थितीतच चक्क रिसोड येथील पोलीस ठाण्यात विवाह लावण्यात आला. कुटुंबाचा, समाजाचा विरोध झुगारून एकमेकांसोबत आयुष्यभर राहण्याच्या आणाभाका या प्रेमीयुगुलाने घेतल्या होत्या. पवन रमेश कांबळे आणि मनिषा संतोष मानवतवर, असे प्रेमीयुगुलाचे नाव आहे.
हेही वाचा - मुरबाडमध्ये एसटी आणि खासगी बसची समोरासमोर धडक ; 21 जखमी
भर जहाँगीर येथील युवक पवन आणि त्याच्या गावातीलच तरुणी मनिषा या दोघांमध्ये प्रेमसंबंध जुळून दोघांनीही विवाह करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र, दोन्ही कुटुंबांमध्ये अंतर्गत कलह निर्माण झाला. दरम्यान, तंटामुक्त गाव समितीचे अध्यक्ष सत्यनारायण फुके आणि रिसोड पोलीस ठाण्याचे उपनिरीक्षक संतोष नेमणार यांनी दोन्ही कुटुंबीयांचे मनोमिलन घडवून आणले. पवन आणि मनिषाचे लग्न जुळवून दिले. वाद घालण्यापेक्षा परस्परांमध्ये समन्वय साधणे अधिक चांगले ही भावना पटल्यामुळे दोघांच्याही कुटुंबातील सदस्यांच्या साक्षीने पवन व मनिषाचा बुधवारी पोलीस ठाण्यात विवाह लावून देण्यात आला.