वाशिम - कोरोना विषाणू संसर्गाचे लवकर निदान होऊन उपचार सुरू झाल्यास रूग्ण बरे होण्याची शक्यता सर्वाधिक असते. याउलट परिस्थिती हाताबाहेर गेल्यानंतर रुग्णालयात दाखल झाल्यास डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा कालावधी मिळत नाही. परिणामी बाधित व्यक्तीचा मृत्यूही होवू शकतो. त्यामुळे कोरोना संसर्गाची लक्षणे दिसताच स्वतः हून प्रशासनाला माहिती देण्याचे व आपली तपासणी करून घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी हृषीकेश मोडक यांनी केले होते. त्यानुसार आत्तापर्यंत जिल्हा प्रशासनाच्या हेल्पलाईनवर स्वतः हून माहिती दिलेल्या चार व्यक्तींना कोरोना संसर्ग झाल्याचे निदान झाले आहे. या चारही व्यक्तींवर तातडीने उपचार सुरू करण्यात आले आहेत.
कोरोना संसर्ग झालेल्या व्यक्तींमध्ये ताप, सर्दी, कोरडा खोकला, घसा दुखणे, जिभेची चव जाणे, श्वास घेण्यास त्रास होणे यासारखी प्रमुख लक्षणे आढळतात. लवकर निदान झाल्यास व योग्य औषधोपचार मिळाल्यास या आजारातून बाधित व्यक्ती बरी होते. त्यामुळे अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींनी तातडीने, स्वतःहून नजीकच्या फिव्हर क्लिनिकमध्ये येऊन आपली तपासणी करून घ्यावी, अथवा जिल्हा प्रशासनाच्या ८३७९९२९४१५ या व्हॉटसअॅप हेल्पलाईन क्रमांकावर माहिती द्यावी, असे आवाहन जिल्हाधिकाऱयांनी केलेले आहे.
एखादी व्यक्ती कोरोनाबाधित आढळल्यास त्या व्यक्तीकडे, तिच्या कुटुंबाकडे पाहण्याचा लोकांचा दृष्टीकोन बदलतो, असा अनुभव असल्याने कोरोनाची लक्षणे असलेल्या व्यक्ती आपला आजार लपवतात. त्रास वाढल्यानंतर, परिस्थिती अधिक बिकट झाल्यानंतरच या व्यक्ती रुग्णालयात येतात. परिणामी, डॉक्टरांना उपचारासाठी पुरेसा वेळ मिळत नाही आणि त्या व्यक्तीला आपला जीव गमवावा लागतो.
दरम्यानच्या काळात इतर व्यक्तींनाही त्यांच्यापासून संसर्ग होतो. त्यामुळे आपल्या आजूबाजूला, कुटुंबात अशी लक्षणे असलेल्या व्यक्तींना आरोग्य तपासणीसाठी प्रोत्साहित करणे, त्याला मानसिक आधार देणे आवश्यक आहे. जेणेकरून त्या व्यक्तींना वेळेत उपचार मिळतील व तिच्यापासून इतरांना होणारा संसर्गही मर्यादित राहील, असे जिल्हाधिकारी मोडक यांनी सांगितले.