वर्धा - वर्षभरात महिलांवरील अत्याचाराच्या जवळपास 300 ते 400 घटना घटना घडल्या आहेत. याविरोधात भारतीय जनता पक्षाच्या वतीने आंदोलन करण्यात आले. महिलांवर होणारे अन्याय, अत्याचार हे थांबत नसताना तिकडे मात्र, सरकार बदल्या करण्यात खुश आहे. तसेच ज्या जिल्ह्यात दारूबंदी आहे, ती दारूबंदी खुली करण्यात खुश आहे, अशी टीका भाजपा खासदार रामदास तडस यांनी केली.
भाजपाच्या महिला मोर्चाच्या जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. यावेळी महाविकास आघाडी सरकारचा निषेध नोंदवत घोषणाबाजी करण्यात आली. यावेळी भाजपा महिला आघाडीच्यावतीने जिल्हाधिकारी विवेक भिमनवार यांना निवेदन देण्यात आले.

महिला अत्याचाराच्या विरोधात आज (सोमवारी) राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले. संपूर्ण महाराष्ट्रात गेल्या वर्षभरापासून महिलांच्या अत्याचाराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. कोरोनाच्या संकट काळामध्ये कोरोना सेंटरमध्येही महिलांवरचे अत्याचार झालेले आहे. नॅशनल क्राईम ब्युरोच्या अहवालानुसार 286 महिला अत्याचाराच्या क्रूर घटना घडल्या आहेत. यातील 47 घटना एकट्या महाराष्ट्र्रात आहेत, अशी माहिती महिला आघाडी प्रभारी अर्चना वानखेडे यांनी दिली. यामुळे राज्याचे मुख्यमंत्री आणि गृहमंत्री यांनी याची दखल घ्यावी. अन्यथा तीव्र आंदोलन केले जाईल, असा इशारा यावेळी देण्यात आला.
यावेळी भाजपाचे जिल्हाध्यक्ष डॉ. शिरीष गोडे, नगराध्यक्ष अतुल ताराळे, भाजयुमोचे जिल्हाध्यक्ष वरून पाठक, श्रीधर देशमुख, भाजपा महिला आघाडी जिल्हाध्यक्ष मंजुषा दुधवडे, आदी. उपस्थित होते.