ठाणे- देशात कोरोनाबाधित रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली आहे. त्यामुळे, कोरोनाचा संसर्ग थांबवण्यासाठी कसोशीने प्रयत्न करणाऱ्या यंत्रणांवरची जबाबदारीही वाढत चालली आहे. नागरिकांमध्ये देखील भितीचे वातावरण पसरले आहे. अशातच शहरातील दोन कोरोनाबाधितांना उपचारानंतर सुट्टी देण्यात आली असून, त्यामुळे शहरवासियांना थोडासा का असेना पण दिलासा मिळाला आहे.
कासारवडवली येथील एक व्यक्ती फ्रान्सवरून आल्यानंतर त्याच्यात कोरोनाची लक्षणे आढळली होती. त्यानंतर त्याला १२ मार्च रोजी कस्तुरबा गांधी रुग्णालयात चाचणीसाठी नेण्यात आले होते. त्यांचा कोरोना चाचणी अहवाल पॅाझिटिव्ह आल्याने त्यांला रुग्णालयात दाखल करण्यात आले. १४ दिवस उपचार केल्यानंतर त्यांचा कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला काल रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली.
विहार येथील एका व्यक्तीला देखील लंडनवरून आल्यानंतर २७ मार्चला फोर्टिज रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले होते. ३० मार्चला या व्यक्तीला कोरोना झाल्याचे समजले. १४ दिवसाच्या उपचारानंतर या व्यक्तीचे कोरोना चाचणी अहवाल निगेटिव्ह आल्याने त्याला काल रुग्णालयातून सुट्टी देण्यात आली. त्यामुळे, आता कोरोनातून मुक्त झालेल्या रुग्णांची संख्या दोन झाली आहे.
हेही वाचा- भिवंडीतील भाजी मार्केट १४ एप्रिलपर्यंत बंद