ठाणे : हैदराबाद येथील सासरी असलेली योगिता रुमाल (वय ३०) ही महिला आपल्या माहेरी भिवंडी येथील धामणकर नाका परिसरात आपल्या वडिलांकडे आली आहे. त्यातच गेल्या सहा महिन्यांपासून मुलगी ऋषिता रुमाल या बाळावर मुंबईतील केईएम रुग्णालयात उपचार सुरू आहेत. योगिता ही बुधवारी देखील आपल्या मुलीला घेऊन वडिलासंह रुग्णालयात मुंबईला गेली होती. त्यानंतर मुंबईहून भिवंडीला परतत असताना ती अंबरनाथ लोकलने येत होती. दुपारी तीनच्या सुमारास अंबरनाथ लोकल ठाकुर्ली आणि कल्याण स्थानकादरम्यान २ तास उभी होती. यावेळी काही प्रवासी उतरून कल्याणच्या दिशेने चालत होते. त्यात लोकलमधून उतरुन रेल्वे ट्रॅकवरून पुढे चालत योगिता रुमाल ही तिच्या लहान बाळाला घेऊन वडिलांसह निघाली होती. तेव्हा तिच्या हातून बाळ निसटून वाहत्या नाल्यात पडले. पाण्याच्या वाहत्या प्रवाहासोबत बाळ खाडीत वाहून गेल्याने एकच खळबळ उडाली होती. विशेष म्हणजे, कल्याण ते मुंब्रा खाडीपर्यंत त्या चिमुकलीचा शोध घेण्यात आल्याची माहिती शोध मोहीम पथकाकडून देण्यात आली आहे.
चिमुकली न मिळाल्याने आईचा आक्रोश : या घटनेनंतर स्थानिक पोलीस, रेल्वे पोलीस, अग्निशमन दलाचे जवान यांनी दुपारी शोधकार्य सुरू केले. मात्र घटनास्थळी अंधार पडला असून बाळाच्या शोध मोहिमेत अळथळा येत असल्याने शोधमोहीम थांबविली गेली. आज पुन्हा जयराज देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली गुरुवारी सकाळपासून एनडीआरएफ पथकांनी पत्रीपूल, मोठागाव, कोपर, दिवा, मुंब्रा परिसरात खाडीच्या दोन्ही बाजुची झुडपे, किनारे भागात दुपारपर्यंत शोध घेतला. मात्र चिमुकली आढळून न आल्याने त्यांनी बचावकार्य थांबविले. आधारवाडी अग्निशमन दलाचे स्थानक अधिकारी हरी भडांगे यांच्या मार्गदर्शनाखाली जवानांनी दुर्गाडी, आधारवाडी परिसर ते साईबाबा मंदिरापर्यंत दुतर्फा बाळाचा शोध घेतला. संध्याकाळपर्यंत हे शोध कार्य सुरू होते. वेगवान प्रवाहामुळे शोध कार्यात अडथळे येत होते. त्यामुळे जवानांनी संध्याकाळी आपले बचाव कार्य थांबविले; मात्र २४ तास उलटूनही चिमुकली बेपत्ताच असल्याने आजही आईचा आक्रोश काळीज पिळवटून टाकणारा होता.