ठाणे - लॉकडाऊनमुळे हातावर पोट भरणाऱ्या कामगार, मजुरांच्या कुटुंबाची उपासमार पाहून रामकृष्ण मिशनच्या स्वयंसेवकांनी मुरबाड तालुक्यातील शेकडो आदिवसी कुटुंबियांच्या पोटाला आधार दिला आहे. विशेष म्हणजे ठाण्यात राहणारे रामकृष्ण मिशनचे स्वयंसेवक श्रीरंग उऱ्हेकर यांनी त्यांचा मुलगा आरवच्या वाढदिवसाला होणारा खर्च टाळून सुमारे २०० आदिवासी बांधवांच्या जेवणाची सोय करून कोरोनाच्या संकटकाळात उपासमार होणाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.
देशभरात कोरोनाचा कहर पाहता खबरदारीचा उपाय म्हणून राज्यात संचारबंदीसह लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. यामुळे दुर्गम भागातील गाव-पाड्यावर राहणाऱ्या शेकडो आदिवासी कुटुंबावर उपासमारिची वेळ येऊन ठेवली होती. यांच्याच मदतीला मुरबाड मधील रामकृष्ण मिशनचे स्वयंसेवक दीपक देशुमखसह सामाजिक कार्यकर्ते जयवंत सूर्यराव, हिंदू सेवा संघाचे मलिक, सुनील कुमार ही मंडळी धावून आली. तर, लॉकडाऊनमुळे दीपक देशमुख यांच्या मालकीचे हॉटेल बंद असल्याने त्यांनी हॉटेलमधील कामगार व काही स्वयंसेवकांच्या मदतीने लॉकडाऊनच्या दिवसापासून हॉटेलमध्येच शेकडो आदिवसी कुटुंबासाठी खिचडी तयार करून बहुतांश गाव-पाड्यांवर जाऊन त्या खिचडीचे वाटप दरदिवशी करत आहेत.
मात्र, मुरबाडमध्ये कोरोनाबाधित रुग्ण आढल्याने शहर तीन दिवस सील करण्यात आले होते. त्यामुळे आम्हाला तीन दिवस अन्न वाटप करता आले नसल्याची खंत देशमुख यांनी व्यक्त केली आहे. दरम्यान, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे हाताला काम नसणाऱ्या मजुरांना विविध स्थरातील व्यक्ती मदतीचा हात पुढे करताना दिसत आहे. तर, लहान मुलेही पिगी बँकमध्ये गोळा झालेली रक्कम दान करत आहेत. त्याचप्रमाणे ठाण्यात राहणारे रामकृष्ण मिशनचे स्वयंसेवक श्रीरंग उऱ्हेकर यांनीही त्यांचा मुलगा आरवच्या दुसऱ्या वाढदिवसाचा होणारा खर्च टाळून सुमारे २०० आदिवासींच्या जेवणाची सोय करून कोरोनाच्या संकटकाळात उपासमार होणाऱ्यांना मदतीचा हात पुढे केला आहे.