ठाणे - स्मशानभूमीच्या जागेत कचरा टाकण्याच्या वादातून गावकऱ्यांनी कल्याण-डोंबिवली महापालिकेच्या (केडीएमसी) ५ कंत्राटी सफाई कामगारांना मारहाण केली आहे. या निषेधार्थ केडीएमसीच्या कंत्राटी कर्मचाऱ्यांनी आज सकाळपासून कल्याण पश्चिम 'ब' आणि 'क' प्रभागात काम बंद आंदोलन केले आहे. यामुळे शहरात जागोजागी कचऱ्याचे ढीग साचल्याचे पाहायला मिळाले.
ज्या ठिकाणी कचरा टाकण्यात आला. ते ठिकाण स्मशानभूमी असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. आणि या ठिकाणी कचरा टाकायला नागरिकांचा विरोध होता. मात्र, कचरा टाकल्याने गावकऱ्यांनी केडीएमसीच्या ५ कर्मचाऱ्यांना मारहाण केली, अशी माहिती अखिल भारतीय कामगार कर्मचारी संघाचे अध्यक्ष निखिल चव्हाण यांनी दिली.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार टाकला होता कचरा
केडीएमसी अधिकाऱ्यांनी दिलेल्या आदेशानुसार कंत्राटी कर्मचारी संबंधित जागेवर कचरा टाकण्यास गेले होते. केडीएमसी आणि संबंधित जागामालक यांच्यातील हा वाद असून कर्मचाऱ्यांचा त्याच्याशी काहीही संबंध नव्हता. या ५ सफाई कर्मचाऱ्यांना झालेल्या मारहाणीच्या निषेधार्थ आज आम्ही कामबंद आंदोलन सुरू केले आहे, अशी माहिती निखिल चव्हाण यांनी दिली. तसेच, यासंदर्भात आम्ही केडीएमसी उपयुक्तांची भेट घेऊन कुठे कचरा टाकावा याबाबत लेखी आदेश देण्याची मागणी करणार असल्याचेही चव्हाण यांनी सांगितले.
हेही वाचा - भाईंदर खाडीवरचा पूल तोडण्यास सुरुवात, १३३ वर्षे जुना रेल्वेपूल होणार इतिहास जमा..