सोलापूर - राज्यातील विविध जिल्ह्यातून आलेल्या हजारो तरुण-तरुणींनी सोलापुरातील भुईकोट किल्ला स्वच्छ केला. राजा शिवछत्रपती परिवाराच्यावतीने ही मोहीम हाती घेण्यात आली होती. यासाठी राज्यभरातील विविध जिल्ह्यातील सुमारे १००० तरुण-तरुणी यामध्ये सहभागी झाले होते. सर्वांनी भगवे टी-शर्ट घालून स्वच्छता केली.
अखंड राजा शिवछत्रपती परिवार हा गेल्या साडेपाच वर्षांपासून महाराष्ट्रातील २२ जिल्ह्यातील दुर्ग स्वच्छता, अनाथ मुलांना व गरीब विद्यार्थ्यांनी शैक्षणिक साहित्य वाटप, शेतकर्यांना धान्य वाटप करीत आहे. सुरुवातीला ११ मावळे घेऊन सुनिल सुर्यवंशी यांनी परिवाराची सुरुवात केली. आज त्याच ११ जणांचे २२ जिल्ह्यांत विभाग तयार झाले आहेत. पुणे, नाशिक, सोलापूर, कोल्हापूर, जळगाव, रत्नागिरी, औरंगाबाद, जालना, बीड, लातूर, वाशिम, अहमदनगर, सातारा, सांगली, रायगड, मुंबई, अहमदनगर, पालघर, अकोला, जालना असे विभाग आहेत. सर्वजण प्रत्येक महिन्यातील एक दिवस गडाची स्वच्छता करतो. प्रत्येक जिल्ह्यात प्रत्येक महिन्यातील एक रविवारी त्या जिल्ह्यात स्वच्छता मोहीम राबविली जाते.
प्रत्येक जिल्ह्यात कमीत कमी १०० ते ११० मावळे सहभागी होऊन एक दिवस आपल्या राजांचा इतिहास जपण्यासाठी प्रयत्न करतात. ३ महिने प्रत्येक जिल्ह्यात विभागीय मोहीम असते. त्यानंतर सर्व जिल्हे मिळून एक मुख्य मोहीम राबविली जाते. त्यावेळी २२ जिल्ह्यातील मावळे व रणरागिणी उपस्थित असतात.
मुख्य मोहीम २ दिवस असते. पहिल्या दिवशी देवदर्शन, अनाथ मुलांना मदत व दुसऱ्या दिवशी गड स्वच्छता करतात. जवळपास ८०० ते १,००० मावळे व रणरागिणींचा या स्वच्छता मोहीमेत सहभाग असतो. परिवारात एकमेकांना आदराने ताई व दादा बोलले जाते. लहान असो किंवा मोठा प्रत्येकाला आदर दिला जातो. या आगळ्या वेगळ्या मोहिमेमुळे सोलापुरातील शिवप्रेमींच्या मनात छत्रपतींच्या विचारांची पेरणी झाली. त्यामुळे यापुढील मोहिमेत सोलापूरकर मावळे मोठ्या हिरहिरीने सहभागी होणार आहेत.