सोलापूर - राज्याचे सहकार मंत्री बाळासाहेब पाटील यांनी अनेक वर्षांपासून ऊस दराच्या एफआरपीबाबत शब्दही काढला नाही. त्यामुळे अशा बेजबाबदार सहकारमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी जनहित शेतकरी संघटनेचे अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांनी केली आहे.
पंढरपूर तालुक्यातील रोपळे येथील शेतकऱ्यांच्या वतीने जनहित शेतकरी संघटनेचे संस्थापक अध्यक्ष प्रभाकर देशमुख यांचा सत्कार करण्यात आला. कार्यक्रमासाठी जनहितचे जिल्हा उपाध्यक्ष चंद्रकांत निकम, नामदेव काळे महाराज, जिल्हा युवक अध्यक्ष श्रीकांत नलवडे, युवक तालुकाध्यक्ष नाना मोरे, मोहोळ तालुका उपाध्यक्ष शिवाजी जाधव, विठ्ठल कोळी, शिरगिरे, पांडुरंग गुंड, दत्तात्रय गायकवाड, औदुंबर गायकवाड, महादेव गायकवाड, कल्याण कदम, महादेव रोकडे, रवींद्र बिस्किटे, गणेश उरवणे, सर्जेराव पाटोळे, आदी उपस्थित होते. प्रास्ताविक औदुंबर गायकवाड यांनी केले.
जिल्हाधिकारी व सहकार आयुक्तांनी येत्या आठ ते दहा दिवसांत सोलापूर जिल्ह्यातील कारखानदारांची व शेतकरी संघटनेची एफआरपी संदर्भात बैठक घ्यावी, अशी मागणी देशमुख यांनी केली. अन्यथा सोलापुरातील सर्व साखर कारखाने शेतकरी संघटनेकडून बंद पाडण्यात येतील, असा इशारा त्यांनी दिला.
ऊसदर आंदोलनात शेतकऱ्यांचा सहभाग महत्त्वाचा
सोलापूर जिल्ह्यातील साखर कारखान्यांविरुद्ध सर्व शेतकरी संघटना एकत्र येऊन आंदोलनाच्या तयारीत आहेत. त्यामध्ये जनहित शेतकरी संघटनेच्या वतीने आमचाही सहभाग असणार आहे. शेतकऱ्यांच्या हक्कासाठी सर्व संघटना एकत्र आल्या पाहिजेत, अशी आमची इच्छा आहे. मात्र या आंदोलनात शेतकरी संघटनांसोबतच सोलापूर जिल्ह्यातील ऊस उत्पादक शेतकर्यांचा सहभाग असणे आवश्यक आहे, असे ते म्हणाले.