सोलापूर - मागील ऊस गळीत हंगामात लोकमंगल कारखान्याला दिलेल्या उसाचे पैसे न मिळाल्याने लगतच्या कर्नाटकातील व दक्षिण सोलापूर तालुक्यातील शेतकऱ्यांनी सोमवारी (दि. 22 जून) लोकमंगल कारखान्यासमोर ठिय्या आंदोलन केले.
कर्नाटक आणि महाराष्ट्राच्या सीमेवर भंडरकवठे येथे असलेला हा कारखाना राज्याचे माजी सहकारमंत्री सुभाष देशमुख यांच्या मालकीचा आहे. त्यामुळे सत्तेत असताना आणि सत्ता गेल्यावरही शेतकऱ्यांच्या रकमा थकविण्याची
प्रथा या कारखान्याने कायम ठेवली आहे.
कोरोना काळात टाळेबंदीचे कारण देत ऊसबीले मिळाली नाहीत. पण, आता शेतकर्यांच्या सहनशक्तीचा अंत झाल्यानेच हे आंदोलन करण्यात आले. उंबराणी येथून घोळक्याने आलेल्या ऊसउत्पादक शेतकऱ्यांनी सकाळी आठ वाजल्यापासून भंडारकवठे येथील लोकमंगल कारखान्यांपुढे ठिय्या दिला.
गेल्या पाच महिन्यांपासून ऊसबील न मिळाल्यामुळे परिसरातील आणि कर्नाटकातील ऊसउत्पादक शेतकरी मोठ्या प्रमाणात जमा झाले. त्यांनी कारखान्याच्या फाटकावर घोषणाबाजी केल्यावर त्यांना स्थानिक शेतकऱ्यांनीही यास साथ दिली. त्यामुळे परिस्थिती हाताबाहेर जाऊ नये म्हणून कारखाना व्यवस्थापणाने मंद्रुप पोलिसांना पाचारण केले. मात्र, शेतकऱ्यांच्या दबावापुढे लोकमंगल करखान्याच्या व्यवस्थापणाने तडजोडीचा मार्ग अवलंबत येत्या 25 तारखेपर्यंत सर्व रकमा देण्याचे आश्वासन दिले. त्यावर आंदोलकांनी आश्वासन न पाळल्यास पुन्हा 26 तारखेपासून उग्र आंदोलनाचा इशारा दिला आहे.
हेही वाचा -आषाढीला विठ्ठलरुपी वृक्षाची लागवड करा, अभिनेते सयाजी शिंदेंचं आवाहन