सोलापूर - महाराष्ट्र व केरळ या राज्यात कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. त्या पार्श्वभूमीवर कर्नाटक राज्य सरकारने महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. केरळ व महाराष्ट्र राज्यातील नागरिकांना कोव्हिड निगेटिव्ह प्रमाणपत्र असल्याशिवाय कर्नाटकामध्ये प्रवेश न देण्याचा निर्णय घेतला आहे. या निर्णयामुळे सोलापूर जिल्ह्याला चिकटून असलेल्या सीमेवर कर्नाटक प्रशासनाकडून महाराष्ट्र राज्यातून येणाऱ्या प्रत्येक प्रवाशांची कसून तपासणी करून प्रवेश दिला जात आहे. याबाबतचे परिपत्रक कर्नाटकचे आरोग्य मंत्री के. सुधाकर यांनी काढले आहे.
![कर्नाटक चेकपोस्ट कोरोना चाचणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-01-thorough-inspection-of-passenger-travelling-from-maharshtra-to-karnataka-at-border-10032_23022021133522_2302f_1614067522_439.jpg)
![कर्नाटक चेकपोस्ट कोरोना चाचणी](https://etvbharatimages.akamaized.net/etvbharat/prod-images/mh-sol-01-thorough-inspection-of-passenger-travelling-from-maharshtra-to-karnataka-at-border-10032_23022021133522_2302f_1614067522_532.jpg)
कोरोनाच्या प्रादुर्भावामुळे निर्णय
महाराष्ट्र राज्यात पुन्हा कोरोना संसर्गजन्य आजाराने थैमान मांडले आहे. महाराष्ट्र राज्यात पुन्हा संचारबंदी किंवा लॉकडाऊन लागू करण्याची वेळ आली आहे. ब्राझील आणि दक्षिण आफ्रिका या देशात कोरोना विषाणूचे नव्या स्ट्रेनचे रुग्ण आढळले आहेत. तशा प्रकारचे रुग्ण महाराष्ट्र आणि केरळ राज्यातही आढळले आहे. त्यामुळे कर्नाटक सरकारने या नव्या स्ट्रेनचा कर्नाटकमध्ये फैलाव होऊ नये, म्हणून महाराष्ट्र आणि केरळ राज्यातील नागरिकांना प्रवेशबंदी किंवा कोरोना निगेटिव्ह प्रमाणपत्र बंधनकारक केले आहे.
सीमेवर असलेल्या धुळखेड, आळंद, दुधनीला तपासणी चेकपोस्ट
महाराष्ट्र राज्यातील सोलापूर जिल्ह्याला कर्नाटक गुलबर्गा आणि विजापूर (विजयपूर) हे दोन जिल्हे लागून आहेत. सोलापूर आणि इतर जिल्ह्यांतून कर्नाटक राज्यात जाणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी आहे. त्यामुळे कर्नाटक राज्य शासनाने धुळखेड, आळंद, दुधनी या भागात तपासणी चेकपोस्ट उभे केले आहेत. येथून जाणाऱ्या प्रत्येक प्रवाशाची कसून तपासणी केली जात आहे.