सिंधुदुर्ग - कोकणात अनेक अगम्य गोष्टी अनुभवायला मिळतात. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण तालुक्यातले श्रावण गाव असेच गूढ गोष्टींनी व्यापलेले. या गावातील तळेवाडीत श्री देव क्षेत्रपाल देवाचे मंदिर म्हणजे येथील लोकांचे श्रद्धास्थान आहे. देवाला जे अमान्य ते गावातील लोक कधीच करत नाहीत. येथे वर्षानुवर्षे पूर्वजांनी पाळलेल्या रूढी-परंपरा आजही जोपासल्या जात आहेत.
देवाच्या मर्जीत गावाचा गाडा
गाव तसे निसर्गाच्या कुशीत वसलेले. गावात जुन्या धाटणीची अनेक घरे आजही उभी आहेत. गावातील देवस्थानप्रती येथील लोकांची मोठी श्रद्धा आहे. त्यातूनच येथील परंपरा आजही टिकून आहेत. येथील क्षेत्रपाल देवाच्या मर्जीत राहणाऱ्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील या श्रावण गावची ही गोष्ट सर्वांनाच कुतूहल वाटावी अशी आहे. अगदी देवाच्या मर्जीत या गावाचा गाडा चालतो.


तळेवाडीतील क्षेत्रपाल देवाच्या बाबतीत लोकांच्या मनात श्रद्धा आहे, तेवढ्याच येथील लोकांच्या मनात या देवाच्या आख्यायिका रूढ झाल्या आहेत. क्षेत्रपालाच्या मंदिरात महिलांना प्रवेश नाही. या मंदिराच्या परिसरात शिकारीलाही बंदी आहे. शिवाय या भागात कोणत्याही जीवाचे रक्त सांडलेले क्षेत्रपाल देवाला मान्य नाही अशी येथील लोकांची धारणा आहे.
येथे शांतता राखावी लागते
क्षेत्रपाल देवाच्या परिसरात आरडाओरडा केलेला चालत नाही. येथे शांतता राखावी लागते. येथे रक्त सांडलेले देवाला चालत नाही. एवढंच काय येथील तळेवाडीत रात्र झाली की जोरजोरात रडायलाही बंदी आहे. त्यामुळे एखाद्या व्यक्तीचे देहावसान झाले तरी येथील लोक रडत नाहीत, अशी माहिती दत्ताराम सुकळी यांनी दिली.

कृष्णा परब हे येथील मंदिरातले मानकरी आहेत. ते सांगतात या मंदिर परिसरात दारू पिऊन येणे, मांस खाऊन येणे देवाला पसंत नाही. येथे खूप काळजी घ्यावी लागते. मंदिराच्या मध्ये क्षेत्रपाल देवाचे पाषाण आहे. तर बाजूला जैन पाषाने आणि बारा पाचांच्या मानाचे दगड आहेत. अशी माहिती सुकळी यांनी दिली.
मंदिराच्या मागच्या बाजूला रडण्याचा आवाज येऊ लागला
नारायण मालप सांगतात, या ठिकाणी एकदा या ठिकाणी एकदा रात्री सत्यनारायणाची पूजा होती. त्यावेळी मंदिराच्या परिसरात कोणीतरी बंदुकीचा आवाज काढला. यावेळी मंदिराच्या मागच्या बाजूला रडण्याचा आवाज येऊ लागला. त्यानंतर आम्ही येथे माहिती घेतली असता रात्री कोणतेही कार्यक्रम करायचे नाहीत, असे देवाने सांगितले. त्यामुळे 7 वाजेपर्यंत येथे कोणतेही कार्यक्रम आणि शांततेत आपण करू शकतो. येथे आरडाओरडा चालत नाही, असे सुकळी म्हणाले.
तळीतील पाणी पावसात वाहत नाही
या ठिकाणी पाण्याची एक तळी आहे. याबाबत मंगेश मालप हा येथील तरुण सांगतो, या तळीतील पाणी पावसात वाहत नाही आणि उन्हाळा आला की ते वाहू लागते. निसर्गाच्या या अद्भुत चमत्काराचे संशोधन व्हावे, असेही त्यांचे मत आहे. उन्हाळ्यात जरी या तळीतील सर्व पाणी बाहेर खेचले तरी दुसऱ्या दिवशी ती तेवढीच भरून वाहते. आजवर या तळीच्या बाबतीत पूर्वज जे सांगत आले आहेत, तसेच आम्ही अनुभवत आहोत, असेही सुकळी यांनी सांगितले. कोकणातील अनेक गूढ आणि अगम्य गोष्टीतील श्रावण गावची ही एक गोष्ट नक्कीच डोक्याला विचार करायला लावणारी आहे.
