सिंधुदुर्ग- कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सुरक्षेच्या दृष्टीने आचरा बाजारपेठीतील व्यापाऱ्यांनी रविवारी आठवडा बाजारा दिवशी दुकाने बंद ठेवून कडकडीत बंद पाळला. दशक्रोशीची बाजारपेठ असलेल्या आचरा बाजारपेठेत शुकशुकाट पसरला होता. १७ मे पर्यंतचे दोन बाजार बंदच ठेवण्यात येणार आहेत.
हेही वाचा- केईम रुग्णालयातील 'त्या' व्हायरल व्हिडिओचा अहवाल आरोग्य विभागाच्या अतिरिक्त आयुक्तांनी मागवला
शासनाने ग्रामीण भागातील व्यवहार पुर्ववत सुरू करण्यास सशर्त परवानगी दिली. मागील गुरुवारच्या आठवडा बाजार दिवशी बाजारात उसळलेल्या गर्दीमुळे सोशल डिस्टनचा बोजवारा उडाला होता. रेडझोन मधून येणाऱ्यांचे प्रमाण वाढत असताना आठवडा बाजाराला होणारी गर्दी नागरिकांसाठी धोकादायक ठरू शकते. या गोष्टींचा विचार करुन आचरा आपत्कालीन समिती आणि व्यापारी संघटना आचरा यांच्या सहकार्याने १७ मे पर्यंतचे दोन रविवार आणि गुरुवार असे तीन आठवडा बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला.
या दृष्टीने रविवार आठवडा बाजार व्यापाऱ्यांनी कडकडीत बंद ठेवला होता. केवळ काही वेळेपुरतेच लोकांची गैरसोय होऊ नये याची खबरदारी घेत मेडिकल स्टोअर्स उघडे होते. या बंदला ग्राहकांनी, आचरा ग्रामस्थांनी सहकार्य देत बाजारात येण्याचे टाळल्याने रस्त्यांवर शुकशुकाट पसरला होता.
आचरा पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस कर्मचाऱ्यांनीही सुरक्षेच्या कारणात्सव आचरा तिठ्यावर चोख बंदोबस्त ठेवला होता. आर्थिक नुकसान सोसत आचरा व्यापाऱ्यांनी आपल्या गावाच्या सुरक्षेला महत्त्व देत आठवडा बाजारा दिवशीच आपले व्यवसाय बंद ठेवले. त्यामुळे व्यापारी संघटनेचे अध्यक्ष अर्जुन बापर्डेकर, जिल्हा परिषद सदस्य जेराॅन फर्नांडिस, सरपंच प्रणया टेमकर यांनी या योगदानाचे कौतुक केले आहे.