चंद्रपूर - चिमूर तालुक्यातील सातारा येथे यमूनाबाई पांडुरंग गायकवाड (६५) व पती पांडूरंग गायकवाड दोघेही स्वतःच्या शेतात संरक्षीत वनक्षेत्र (गट क्रमांक १४३/७) मध्ये नेहमीप्रमाणे मोहफुले गोळा करायला गेले होते. मात्र, मोहफुले गोळा करत असताना वाघाने सायंकाळच्या दरम्यान यमुनाबाई यांच्यावर हल्ला केला. त्यांच्या ओरडण्याने ही बाब पांडूरंग यांच्या लक्षात आली. त्यांनी पत्नीला वाचवण्याचा प्रयत्न केला. मात्र, वाघाने यमुनाबाई यांना ठार केले.
हेही वाचा... लॉकडाऊन : शिवभोजन योजना आता तालुका स्तरावर, पुढील 3 महिने 5 रुपयांत मिळणार जेवण
वाघाने यमुनाबाई यांना ठार मारून साधारण अर्धा किलोमीटर ओढुन जंगलात नेले होते. पांडूरंग यांच्या ओरडण्याने शेताजवळ असलेले इतर शेतकरी आणि गावातील नागरिक धावुन आले. ज्यामुळे वाघ पळून गेला. या घटनेची माहिती वन विभाग आणि पोलीस प्रशासनाला देण्यात आली. त्यानंतर खडसंगी वन परिक्षेत्र अधिकारी किरण धानकुटे, वनक्षेत्र अधिकारी आर. जी. कोडापे, ताडोबा वन परिक्षेत्र अधिकारी एन. डी. शेन्डे यांनी घटनास्थळावर पोहचून पंचनामा केला. यमुनाबाई यांचा मृतदेह शवविच्छेदनासाठी उपजिल्हा रुग्णालय चिमूर येथे पाठवण्यात आला आहे. मात्र, या घटनेने शेतकऱ्यांमध्ये दहशत पसरली आहे.