सातारा - सातारा-कोरेगाव येथे रेल्वे स्थानकाजवळ असलेल्या पुलानजीक दहिवडीवरून साताऱ्याला जाणाऱ्या बसचे ब्रेक निकामी झाल्याने अपघात झाला. या अपघातात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. चालकाच्या प्रसंगावधानामुळे प्रवाशांचे प्राण वाचले. पुढे काही अंतरावरच नदी असल्याने मोठा अनर्थ घडला असता.
याबद्दल अधिक माहिती अशी की, दहिवडीवरून साताऱ्याला जाणारी वाई आगाराची बस सकाळी अकरा वाजता कोरेगावमधून एक किलोमीटर बाहेर आल्यानंतर रेल्वे स्थानकाच्या शेजारीच ब्रेक निकामी झाल्याचे चालकाच्या लक्षात आले. त्याने प्रसंगावधान दाखवत बस रस्त्यावरून बाजूला केली व नदीत जाणारी बस झाडावर धडकवली. यामुळे मोठा अपघात टळला आहे. चालकाने प्रसंगावधान राखल्याने बसमधील 25 प्रवाशांचे प्राण वाचले. मात्र, बस झाडाला धडकल्याने अनेक जण जखमी झाले आहेत. घटनेची माहिती समजताच अपघातस्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. तसेच जखमींना जवळील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.