सांगली - देवदर्शनाहून परतणाऱ्या कारवरील चालकाचे नियंत्रण सुटल्याने बोरगाव (ता.वाळवा) मधील वंजारी मळ्याजवळ अपघात झाला. या अपघातात कारमधील दोन तरुण जागीच ठार झाले तर इतर चार जण जखमी झाले. शुभम सयाजी सूर्यवंशी व अक्षय सुरेश गायकवाड असे मृत झालेल्यांची नावे आहेत.
या अपघाताची मिळालेली माहिती अशी, की बोरगाव (ता.वाळवा) पासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वंजारी मळ्याजवळ चारचाकी गाडी (क्रमांक एमएच १२ एम एफ ६२८२) चा भीषण अपघात झाला. या अपघातात शुभम सयाजी सूर्यवंशी वय (२१)व अक्षय सुरेश गायकवाड यांचा जागीच मृत्यू झाला. तर दीपक जगनाथ सूर्यवंशी, अक्षय विठ्ठल सूर्यवंशी, विलास भार्गव सूर्यवंशी आणि हरी आनंदा सूर्यवंशी हे चार जण गंभीर जखमी झाले. ही घटना सोमवारी सायंकाळी ५.१० मिनिटांनी घडली. यातील जखमींना कोल्हापूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.
देवदर्शन व पर्यटनाहून परतत होते
बेलवडे (ता.कडेगाव) येथील सहा तरूण दुपारी १ च्या दरम्यान घरातून एका कारने कडेगांव जवळील धार्मिक व पर्यटन स्थळ असणाऱ्या चौरंगनाथला गेले. हे सहाजण एकाच गावातील व गल्लीतील रहाणारे आहेत. देव दर्शन करून हे इस्लामपूरला आले. तेथून ते घरी परत जात असताना बोरगाव पासून तीन किलोमीटर अंतरावर असणाऱ्या वंजारी मळ्याजवळ भरधाव वेगामुळे चालकाचे कारवरील नियंत्रण सुटले. यावेळी कार पलटी झाल्याने दोघे जण जागीच ठार झाले तर इतर 4 जण जखमी झाले.
गाडीच्या काचा फोडून जखमींना काढले बाहेर
वेगातील गाडी ब्रेक मारुन थांबवण्याचा प्रयत्न केल्याने ती गाडी उडून रस्त्यवजवळी शेताच्या नाल्यात 5 फुट जाऊन पडली. आजु-बाजुच्या शेतकऱ्यांनी घटनास्थळी पोहोचून कारमध्ये अडकलेल्या जखमींना काच फोडून बाहेक काढले. त्यानंतर याची माहिती इस्लामपूर पोलिसांना दिली. पोलिसांनी अपघाताची नोंद करुन जखमींना पुढील उपचाराकरता शासकीय रुग्णालयात दाखल केले. या घटनेचा अधिक तपास साहाय्यक पोलीस निरीक्षक शेंडगे करत आहेत.